‘आम्ही जरांगे…’ सिनेमात ‘हा’ दिग्गज अभिनेता साकारणार मनोज जरांगेंची भूमिका

| Updated on: May 29, 2024 | 3:48 PM

Maroj Jarage Patil 'Amhi Jarange Movie' Release Date : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर सिनेमा येणार आहे. 'आम्ही जरांगे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मनोज जरांगे पाटलांची भूमिका कुणी साकारली? वाचा...

आम्ही जरांगे... सिनेमात हा दिग्गज अभिनेता साकारणार मनोज जरांगेंची भूमिका
Follow us on

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर सिनेमा येणार आहे. याआधी ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या सिनेमाची घोषणा झाली. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आता ‘आम्ही जरांगे’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आम्ही जरांगे’ या सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे हे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार आहेत. ‘आम्ही जरांगे’ गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा सिनेमा येत्या 14 जूनला सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत.

कोण- कोण कलाकार सिनेमात असणार?

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.’आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटांमध्ये अभिनेते मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत.

‘आम्ही जरांगे’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत. चित्रपटाची गीते सुरेश पंडित,पी शंकराम यांनी संगीतबद्ध केली आहेत. मंगेश कांगणे, सुरेश पंडित, पी शंकराम यांनी चित्रपटाची गीते लिहिली आहेत. हिंदीचे सुप्रसिद्ध दिग्गज गायक सोनू निगम, मराठी व हिंदीत नावाजलेले संगीतकार व गायक अजय गोगावले, नकाश अझीझ, आदर्श शिंदे, यांच्या सुमधुर सुरांनी चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत.