देशाच्या पहिल्या निवडणूकीचे शिल्पकार, निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या जीवनावर बनतोय चित्रपट

| Updated on: Jun 03, 2024 | 10:56 PM

'मानवी इतिहासातील लोकशाहीतील सर्वात मोठा प्रयोग', अशा शब्दात या निवडणूकीचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे. याआधी कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या आव्हानाचा सामना कधी केला नव्हता. त्या देशाच्या पहिल्या निवडणूक आयुक्तांच्या जीवनावर चित्रपट येत आहे.

देशाच्या पहिल्या निवडणूकीचे शिल्पकार, निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या जीवनावर बनतोय चित्रपट
film on first election commissioner sukumar sen
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पहिली निवडणूक साल 1951-52 मध्ये झाली. त्यावेळी कोणतीही आधुनिक साधनसामुग्री नसताना भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वाखाली पहिली सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडली. या देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीचे सर्जक शिल्पकार सुकुमार यांच्या जीवनावर आता चित्रपट येणार आहे. रॉय कपूर फिल्म्सने ट्रिकटेनमेंट मीडिया यांच्या सहभागाने भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या जीवनावर बायोपिक तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. देशाच्या गुमनाम नायकाची कहानी पडद्यावर आणण्याचे पाऊल उचलणाऱ्याचे आपण आभारी आहोत अशी प्रतिक्रिया सुकुमार सेन यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. सिद्धार्थ रॉयकपूर ‘रॉय कपूर फिल्म्स’ अंतर्गत हा चित्रपट साकारणार आहेत.

स्वत: एक गणितज्ञ असलेल्या सुकुमार सेन यांनी प्रशासकीय सेवेत दिलेले योगदान देश कधीही विसणार नाही. भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुकुमार सेन यांनी भारताचे एका लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्रात संक्रमण सुरु असण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतासारखा खंडप्राय देश बाल्यावस्थेत असताना देखील निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी ज्याची कोणी कल्पनाही केली नाही अशी एक चिरस्थायी आणि अनुकरणीय निवडणूक प्रणाली तयार केली. यापूर्वी कधीही कोणत्याही निवडणूकीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना सुकुमार यांनी हे शिवधनुष्य सहज पेलले. 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक बनल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे हे त्याकाळातील मोठे कठीण आव्हान त्यांनी पार पारले. परिणामी ‘मानवी इतिहासातील लोकशाहीतील सर्वात मोठा प्रयोग’, त्यांच्याच शब्दात या निवडणूकीचे यथार्थ वर्णन सार्थ ठरले आहे. याआधी कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याने एवढ्या मोठ्या आव्हानाचा सामना केला नव्हता असे म्हटले जाते.

कशी पार पडली देशाची निवडणूक

निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांचे काम त्याच्या त्याकाळात थक्क करणारे होते. तीस लाख चौरस किलोमीटरच्या भूमीत जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा प्रयोग करणे महाकठीण काम होते. पर्वत, वाळवंट आणि जंगलांच्या विविध भूप्रदेशांमध्ये विखुरलेला 175 दशलक्ष लोकसंख्येच्या मतदारांचा देश. त्यापैकी 85 टक्के जनता निरक्षर होती आणि 565 संस्थाने आणि असंख्य नव्याने स्थापन झालेली राज्ये यामधील हजारो शहरे, गावखेड्यांमध्ये विखुरलेले मतदार होते. संसदेच्या सुमारे 500 जागा आणि उर्वरित प्रांतीय असेंब्लीसाठी तब्बल 4.500 जागा होत्या. एका गरीब देशास नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते. अशात 2,24, 000 मतदान केंद्रे बांधली गेली आणि 2 दशलक्ष स्टीलच्या मतपेट्यांनी ती सुसज्ज केली गेली. ज्यासाठी 8,200 टन स्टील वापरले गेले. मतदार यादी तयार करण्यासाठी सहा महिन्यांच्या करारावर 16,500 लिपिकांची नेमणूक केली गेली. मतदार याद्या छापण्यासाठी 3,80,000 कागदाचे रिमचा वापर करण्यात आला आणि 389,816 शाईच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. 56,000 पर्यवेक्षकांना निवडणूकीसाठी नेमण्यात आले. 2,24,000 पोलिस तर 2,80,000 अन्य मदतनीसांची कुमक वापरण्यात आली. पहिल्या निवडणूकीत 70 टक्के मतदान झाले. पहिल्या मतदान प्रक्रियेची ही गाथा आता चित्रपटातून दिसणार आहे.