टीव्हीवरच्या मालिका आणि त्यातील पात्र आपल्या घरची सदस्य होऊन जातात. अशीच एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’… ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. आताही त्यांनी या मालिकेतील नव्या ट्रॅकवर मिलिंग गवळी बोलते झाले आहेत. जेवण बनवता येत नाही. मात्र शुटिंग दरम्यान जेवण बनवावं लागलं. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाळतो त्याच गोष्टी कदाचित आपल्याला भविष्यामध्ये कराव्या लागत असाव्यात, असं मिलिंद गवळी म्हणालेत.
‘अन्नदाता सुखी भव’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’, ‘माणसाच्या हृदयाची वाढ त्याच्या पोटा तून जाते’…. एखाद्या व्यक्तीच्या हातचं चविष्ट जेवण जेवल्यानंतर, आपलं पोट नाही तर मन भरत, आणि एखाद्याच्या हाताची चव, किंवा एखाद्याच्या हातचा पदार्थ आपण जर आनंदाने खाल्ला तर तो आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहतो.
माझी आई अतिशय सुगरण, मी तिच्याशी तासंतास किचनमध्ये गप्पा मारत बसायचो. पण ती जो पदार्थ बनवत असे त्याच्याकडे मी फार कधी लक्ष दिलं. नसल्यामुळे मला स्वयंपाकातलं फार काही कळत नाही. तिला जर स्वयंपाकात मदत केली असती तर मी चांगला शेफ नक्कीच झालो असतो. त्याबाबतीत मी दुर्दैवी ठरलो, माझ्या आईकडून माझी बहीण उत्तम स्वयंपाक शिकली पण मी काहीच नाही शिकलो. पण आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये मला या ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ या कुकरी शो मध्ये सहभाग घ्यावाच लागला आहे. वेगळे वेगळे पदार्थ बनवावेच लागत आहे.
एखाद्याच्या नशिबात जर एखादी गोष्ट लिहिलेली असेल तर ती त्याच्या वाटेला येतेच येते, आयुष्यभर तुम्ही जर ती टाळत असाल तरी तुमची सुटका नाही. जसं माझी आई खूप अध्यात्मामध्ये, देव पुजे मद्धे व्यस्त असायची, त्यामुळे मी कधी देवपूजा, मंदिरात जाणं, हे वर्षानुवर्ष टाळलं होतं . कारण मला असं वाटायचं की माझी आई आम्हा सगळ्यांच्या वाटणीची ईश्वर आराधना करते मग आपण कशाला करा. पण माझं नशीब बघा मी सिनेमात काम करायला लागलो आणि मला सगळ्यात जास्ती अध्यात्मिक, देवाधर्माचे सिनेमे मिळाले.
ज्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानात जाण्याची, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंग करायची संधी मिळाली, शूटिंगच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्याच मुख्य देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. शिर्डीचे साईबाबा अक्कलकोटचे स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज गणेशपुरी वज्रेश्वरी चे नित्यानंद महाराज गगनगिरी महाराज, जेजुरी खंडोबा सकट महाराष्ट्र कर्नाटकातले बारा खंडोबा मी केले आहेत, चार ज्योतिर्लिंग, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी , वणीची सप्तशृंगी देवी, कारल्याची एकवीरा देवी, मी आळंदी ते पंढरपूर विठ्ठल विठ्ठल या सिनेमासाठी वारी पण केली आहे .
आता बहुतेक माझ्या आयुष्यातला एक वेगळे वळण मिळणारे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुतेक cooking, किंवा अन्नदान, world cuisine , किंवा Tasty but still healthy food.आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाळतो त्याच गोष्टी कदाचित आपल्याला भविष्यामध्ये कराव्या लागत असाव्यात. एका वेगळ्या प्रवासासाठी, अनुभवासाठी मी तयार आहे.