कोणाची हिंमत झाली नाही पण…; मिलिंद गवळींनी सांगितला ‘आई कुठे काय करते’ च्या शुटिंगचा किस्सा

| Updated on: Jul 23, 2024 | 7:39 PM

Actor Milind Gawali Post about Aai Kuthe Kay Karte : अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या पोस्ट ते शेअर करत असतात. आताही त्यांनी एक खास पोस्ट शेअर केलीय. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या शुटिंगवर त्यांनी पोस्ट लिहिली आहे. वाचा...

कोणाची हिंमत झाली नाही पण...; मिलिंद गवळींनी सांगितला आई कुठे काय करते च्या शुटिंगचा किस्सा
मिलिंद गवळी, अभिनेते
Follow us on

‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सध्या या मालिकेत एक पाककलाे स्पर्धा दाखवण्यात आली आहे. यात ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ या स्पर्धेत अरुंधतीने सहभाग घेतला आहे. त्यामुळे संजना आणि अनिरुद्ध देखील या स्पर्धेचा भाग झाले आहेत. मालिकेतील या भागाच्या शुटिंगबाबत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं!, असं मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

‘कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं’ काल शूटिंग मध्ये मला कांदे कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, जी sceneची गरज होती,मी म्हणजे अनिरुद्ध पहिल्यांदा कांदा कापतो आणि, त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं, त्याला काही दिसत नाही आणि तो वैतागतो, आणि म्हणतो “काय कटकट आहे ही” “काय फालतुगिरी आहे कशाला आलोय मी इथे?” आणि नंतर त्याला जाणीव होते की स्वयंपाक करणं काय साधी गोष्ट नाहीय. पूर्वी त्याला असं वाटायचं की स्वयंपाक करणाऱ्या बायका काय फार मोठं काम करत नाहीत, स्वयंपाक करणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. कोणीही करू शकतं, अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळेला त्याला ही जाणीव झाली की हे काय फार सोपं नाहीये.

आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किती लोकांना ही जाणीव असते?, की जी माऊली स्वयंपाक करते (आजकालच्या जमान्यात फक्त माउल्या स्वयंपाक करत नाही तर बरेचसे पुरुष ही स्वयंपाक करतात) पण खरंच किती लोकांना ती जाणीव आहे की जो स्वयंपाक करतो, त्याचे किती कष्ट असतात ते अन्न तयार करण्यामध्ये. पण हल्ली अनेकांना मी बघतो की खाताना तोंडं वाकडी करतात, चवच आली नाही असं म्हणतात किंवा आपण काहीतरी बाहेरून मागू या, घरी बनवलेलं बेचव आहे आणि हल्ली तर काय स्विगी, झोमॅटो अशा असंख्य ॲप्स आले आहेतच, ज्याच्याने आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला हवं ते मागवू शकतो.

आजकालची मुलं सर्रास बाहेरून अन्न मागवतात, दीडशे दोनशे अडीचशे मध्ये तुम्हाला ते तुमच्या घरपोच मिळतं, पण त्या अन्नाला घरच्या अन्नाची सर येईल का? किंवा ते तितकं हायजिनिक असतं का? कुठल्या प्रकारचं तेल वापरलं असत? पाम तेल? किती स्वच्छता पाळली असेल? घेऊन येणारा कशा पद्धतीने घेऊन येत असेल? हे सगळं रामभरोसेचं आहे. जसजसं आपण ऍडव्हान्स होत जातो तसतसे आपण परावलंबी होत जातोय किंवा सोप्प करायचं प्रयत्न करतो आणि आपल्या तब्येतीची वाट लावून घेतोय, आपल्या शरीराची वाट लावून घेतोय. असं नाहीये की मी कधी बाहेरचं अन्न खात नाही. पण give an a choice जर एखाद्या माऊलीने तीच्या घरात बनवलेलं अन्न असेल आणि बाहेरचं जनरल अन्न असेल, तर मी घरचं केलेलेच अन्न खातो, मग ती माऊली कोणीही असो.

‘आज मला कोणी नाही पण कांद्याने मात्र मला रडवलं’ पण त्या अश्रूंबरोबर माझे पुन्हा एकदा डोळे उघडले प्रत्येक अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचं मनापासून आभार मानायला हवेत,त्यांच्या कष्टाची कदर करायला हवी,थोडं कमी जास्त झालं असेल तरीसुद्धा मनापासून त्यांचं ग्रहण केलं तर आपली कायम तब्येत चांगली राहील.