कावेरीची मला खूप आठवण येईल, कारण… बहिणीच्या धक्कादायक मृत्यूमुळे अभिनेते जयवंत वाडकर गहिवरले

| Updated on: Jul 09, 2024 | 3:29 PM

ज्या कारने अपघात झाला ती कार शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर चालवत होता. अपघातानंतर तेथे थांबून पीडितांची मदत न करता मिहीर हा लागलीच पळून गेला. या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची ती बहीण आहे.

कावेरीची मला खूप आठवण येईल, कारण... बहिणीच्या धक्कादायक मृत्यूमुळे अभिनेते जयवंत वाडकर गहिवरले
Follow us on

वरळीतील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत असून रविवारी पहाटे बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले. ज्या कारने अपघात झाला ती कार शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर चालवत होता. अपघातानंतर तेथे थांबून पीडितांची मदत न करता मिहीर हा लागलीच पळून गेला. या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची ती बहीण आहे. कावेरी यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूमुळे वाडकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी केली आहे. उद्दामपणा आणि पैशाचा माज थांबला पाहिजे, असल्या लोकांना फटके दिल्याशिवाय पर्याय नाही असेही ते म्हणाले.

या घटनेची माहिती वाडकर यांना रविवारी सकाळी समजली. ती बातमी ऐकून ते हादरलेच.
आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, पुण्यात , नागपूरमध्येही हिट अँड रनची दुर्घटना घडली. त्यावर आपण चर्चा करत असतो. पण रविवारी घडलेली घटना ऐकून मी हादरलोच. माझा विश्वास बसेना, असे त्यांनी नमूद केले.

मी तिला पाहू शकलो नाही…

मी तिला शेवटचं पाहू देखील शकलो नाही. माझं शूटिंग आणि नाटकाचा प्रयोग असल्याने मला तिथे जाता आलं नाही, पण माझा मुलगा, लहान भाऊ तिकडे गेले होते, त्यांनी जे सांगितलं ते मला ऐकवलंही नाही. पण ज्या पद्धतीने तो प्रकार झालाय तो भयानक आहे. या घटनेनंतर मी माझे भावोजी प्रदीप ( कावेरी यांचे पती) याच्यांशी बोललो पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला शब्दच फुटेना. ते त्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगत होते, पण त्याने गाडी अंगावरून तशी पेदरकारपणे नेली असे संतप्त वाडेकर यांनी नमूद केलं.

मला कावेरीची खूप आठवण येईल

कावेरीची माल खूप आठवण येणार आहे. चिराबाजारमध्ये आमचा पारंपारिक गणपती असतो, विशेषत: त्यावेळी तर मला कावेरीची खूपच आठवण येईल. कारण गणेशोत्सवात ती सकाळी लवकर उठून दादरला जाऊन फुलं आणायची, त्याची कंठी, हार वेगवेगळे दागिने बनावयची, सजावट करायची. जेवणाची तयारीही ती अतिशय उत्साहाने करायची, तिचा सर्वत्र वावर असायचा.तिची अनुपस्थिति आम्हाल खूप जाणवणार आहे , असे सांगताना जयवंत वाडेकर खूपच भावूक झाले होते.

ती इतकी मेहनती पोरगी होती ना, खरंच.  वरळी गावात ती लग्न करून गेली, दोन मुलं आहेत तिला. त्यांना मेहनतीने मोठं केलं. दोन्ही मुलं आता चांगला जॉब करत आहेत, त्यांचं घर छान मोठं झालं होतं. तरी रोज सकाळी उठून ती ससून डॉकला यायची, मासे घेऊन विकायची , पतीला सोबत करायची. मी तिला म्हणायचो देखील की आता तुझी दोन्ही मुलं छान कामाला लागली आहेत, आता हे काम नको करूस. पण तरीही ती मेहनत करतच राहीली. बहिणीच्या आठवणीने वाडकरांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरलेल्या आरोपीला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करून शिक्षा दिली पाहिजेच, अशी मागणी जयवंत वाडकर यांनी केली.