Health : वातावरणातील बदल आणि डोळ्यांच्या आरोग्यांवर परिणाम, वेळीच व्हा सावध

| Updated on: Jun 12, 2024 | 4:16 PM

सध्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वाढत्या कारखानदारीमुळे आणि वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन कणांचे प्रदूषण होते. खेडेगावांमध्ये धूळ आणि वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे वातावरण दूषित होते. कडक उन्हाळा आपल्याला जवळजवळ सहा महिने जाणवतो, वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून देखील यावर्षी अभूतपूर्व उन्हाळा आणि अत्युच्च तापमान यांचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आहे.

Health : वातावरणातील बदल आणि डोळ्यांच्या आरोग्यांवर परिणाम, वेळीच व्हा सावध
Follow us on

डोळ्यांवर अशा अति उन्हाळ्याचा वाईट परिणाम अनेक प्रकारे होतो. डोळ्यांना कोरडेपणा येणे जळजळ होणे डोळे लाल होऊन आपल्या डोळ्यातील अश्रू निर्माण करणाऱ्या मेबोमियन ग्रंथी खराब होणे आणि त्यामुळे ड्राय आय सिंड्रोम असा विकार अनेकांमध्ये आढळतो. डोळे वारंवार गार पाण्याने स्वच्छ धुणे नेत्र तज्ञांचा वेळीच सल्ला घेणे आणि डोळ्यांमध्ये लुब्रिकंट औषध टाकणे असे प्राथमिक उपचार करावे लागतात जास्त कोरडेपणा असल्यास त्यासाठी ड्राय आयची आयपीएल लाईट ट्रीटमेंट करावी लागते. याबाबत डॉ. जयंत सरवटे (MBBS, MS Ophthalmology) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उन्हाळ्यामध्ये कोरडेपणा व हवेतील प्रदूषण यामुळे डोळे येणे हा संसर्गजन्य रोग नेहमी आढळतो. डोळे येणे अर्थात व्हायरस किंवा सूक्ष्म जीवाणूंचा संसर्ग होऊन डोळे लाल होतात पापणी आणि डोळ्यांचे आवरण याला फोड येतात, घाण येऊ लागते व डोळ्यांमध्ये रक्तस्त्रावही होतो. याचा उपाय म्हणून परत परत गार पाण्याने डोळे स्वच्छ धुणे आणि नेत्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार अँटिबायोटिक आणि इतर औषधांचा वापर करणे हे उपचार करता येतात.

पावसाळ्यामध्ये शेतामध्ये असलेली बुरशी हवेतून डोळ्यांमध्ये जाते आणि बुबळाला जखम होणे कॉर्नियल अल्सर आणि पू होणे असे विकार येऊ शकतात. त्याचा वेळीच उपचार केला नाही तर डोळ्यांमध्ये कायमचे फूल पडते आणि अंधत्व येऊ शकते. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये डोळ्याच्या एलर्जीचा विकार नेहमी आढळतो याचे कारण म्हणजे हवेमध्ये असणारे पोलन्स.

या एलर्जीची औषधे काही प्रमाणात दर उन्हाळ्यामध्ये अनेक वर्षे डोळ्यांमध्ये घातली तरच ही एलर्जी कमी होऊ शकते या एलर्जीची प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे आपल्याला नियमित टाकावी लागणार आहेत हे डॉक्टरांनी पालकांच्या मनावर नीट बिंबवणे आवश्यक आहे. नाहीतर मुलांची डोळ्याची लाली आणि खाज औषधे टाकूनही कमी होत नाही म्हणून पालक डॉक्टर बदलत राहतात.