मुंबई | 6 डिसेंबर 2023 : हल्ली बदलत्या रहाणीमानामुळे रात्री जेवल्यानंतर डायरेक्ट बेडवर झोपायला जाण्याचा प्रघात पडला असून तो खूपच धोकादायक आहे. आपण थोरामोठ्यांकडून ऐकले असेल की रात्री जेवणानंतर शतपावली करायला हवी तर जेवण पचायला मदत होते. हे खरंच आहे. रात्री डीनरनंतर केवळ आपले पचनच सुधारण्यास मदत होते असे नाही तर शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. चला पाहूयात कोणते फायदे आपल्याला मिळतात ते…
आपण सकाळी नाश्ता करतो आणि दुपारी जेवण करतो त्यावेळी आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपले जेवण पचायला मदत होत असते. परंतू रात्री जेवल्यानंतर थोडे तरी चालायला हवे. कारण जेवणानंतर काही मिनिटात आपल्या शरीरात शुगर तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराच्या काही हालचाली न केल्याने शुगर लेव्हल वाढत असते. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर दहा मिनिटे शतपावली करायला हवी. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल रहायला मदत होते.
रात्री जेवल्यानंतर चालल्याने शरीरातील मेटोबॉलिझम बूस्ट होतो. ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला हवी.
रात्रीचे जेवण झाल्यानंतर नियमित दहा मिनिटे वॉक केल्याने आपले पचनयंत्रणा देखील सुधारते. यामुळे आपल्याला ब्लोटिंग आणि आम्लपित्ताच्या तक्रारी देखील दूर होतात.
जेवल्यानंतर रात्री शतपावली केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच नैराश्य येणे सारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने जेवल्यानंतर लगेच 10 ते 20 मिनिटे चालायला हवे. यामुळे आपण अनेक गंभीर आजार होण्यापासून वाचाल.