नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाल्याने एअर इंडीयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडीयाने येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत तेल अवीव येथे जाणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. एअर इंडीयाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की जरी नियमित विमान सेवा बंद केली असली तरी भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी गरजेनूसार एअर इंडीया आपली चार्टर्ड सेवा सुरु ठेवणार आहे.
एअर इंडीयाने याआधी 14 ऑक्टोबरपर्यंतची आर्थिक तेल केंद्र तेल अवीवहून सुटणारी विमाने बंद केले होते. एरव्ही एअर इंडीया राजधानी नवी दिल्ली ते तेल अवीव करीता आठवड्यातून पाच विमाने चालवित होती. ही विमाने सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी उड्डाण घेतात. इस्रायलहून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या ऑपरेशन अजय अंतर्गत एअर इंडीयाने दोन विमाने पाठविली होती.
ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलहून आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांना देशात सुखरुप आणले आहे. शुक्रवारी 235 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीला पोहचले. परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
याच्या एक दिवस आधी 212 भारतीयांना विशेष विमानाने भारतात आणले होते. भारताने गुरुवारी ( 12 ऑक्टोबर ) ऑपरेशन अजय जाहीर केले होते. या विशेष विमानातून ज्यांना भारतात यायचे आहे त्यांना इस्रायलमधून त्यांच्या विनंतीवरुन सरकारच्या खर्चाने आणले जात आहे.
शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी हमासने अचानक इस्रायलवर हल्ला केला होता. आतापर्यंत 1300 हून अधिक इस्रायली मारले गेले आहेत. तर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 2,215 पॅलिस्टिनी ठार झाले आहेत. तर 8,714 जखमी झाले आहेत.