हज यात्रेकरुंवर मृत्यूचे थैमान, 900 जणांचा मृत्यू, या देशाचे सर्वाधिक नागरिक

| Updated on: Jun 20, 2024 | 7:05 PM

सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना कडक उष्णतेचा फटका बसत आहे. आतापर्यंत या उष्णतेने सुमारे 900 हून अधिक यात्रेकरूंचा बळी घेतला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी हजचा हंगाम बदलतो. मात्र, यंदाचा जून महिना हा राज्यातील सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक ठरला.

हज यात्रेकरुंवर मृत्यूचे थैमान, 900 जणांचा मृत्यू, या देशाचे सर्वाधिक नागरिक
Hajj pilgrims
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

सौदी अरेबियामधील मक्का आणि मदिना येथे हज करण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंचे उष्णतेने हाल होत आहेत. हज करताना आतापर्यंत 900 जणांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी टीव्हीने मक्काच्या ग्रँड मशिदीचे तापमान सोमवारी 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्याचवेळी उष्णतेमुळे आतापर्यंत 35 पाकिस्तानी नागरिकांसह 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिली आहे. हजसाठी सौदी अरेबियात पोहोचलेल्या यात्रेकरूंचा उन्हामुळे मृत्यू होत आहे. मृतांमध्ये इराण, भारत, इंडोनेशिया, इजिप्त आणि ट्युनिशियाचे नागरिक आहेत.

पाकिस्तानच्या हज मिशनचे महासंचालक अब्दुल वहाब सूमरो यांनी 18 जूनपर्यंत एकूण 35 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिली. मक्काच्या ग्रँड मशिदीचे तापमान सोमवारी 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर, जवळपासच्या पवित्र स्थळांचे तापमान 47 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सैतानाला प्रतीकात्मक दगड मारण्याचा प्रयत्न करताना काही लोक बेशुद्ध पडले असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तान वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बहुतांश इजिप्शियन नागरिकांचा समावेश आहे. सौदीमध्ये इजिप्तमधील 600, इंडोनेशियातील 144, भारतातील 68 आणि जॉर्डनमधील 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1400 लोक अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती दिलीय. मात्र. सौदी अरेबिया सरकारने अद्याप अधिकृतपणे मृतांची संख्या जाहीर केलेली नाही.

इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी हजचा हंगाम बदलतो. मात्र, यंदाचा जून महिना हा राज्यातील सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक ठरला. सौदी अरेबिया सरकारने यात्रेकरूंना कडाक्याच्या उष्णतेमध्ये ठराविक वेळेदरम्यान ‘सैतानाला दगड मारण्याचा’ विधी न करण्याचा सल्ला दिला आहे.

12 ते 19 जून दरम्यान चाललेल्या हज यात्रेसाठी यावर्षी जास्तीत जास्त 1,75,000 भारतीय मक्का येथे पोहोचले. केरळचे हज मंत्री अब्दुर रहिमन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जेद्दाहमधील भारतीय दूतावासाला पत्र लिहिले आहे. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. केरळमधील सुमारे 18 हजार 200 हाजी सौदी अरेबियाला गेले आहेत. मंत्री अब्दुर रहिमन यांनी लिहिले आहे की, यात्रेकरूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 30 किमी दूर असलेल्या असिसीला जाण्यासाठी त्यांना तासनतास वाट पहावी लागली. याशिवाय तेथे राहण्याची व्यवस्थाही योग्य प्रकारे करण्यात आली नाही.

दरवर्षी हजारो यात्रेकरू हजला जातात. मात्र, ज्यांच्याकडे व्हिसा नाही किंवा पैसे नाहीत असेही काही प्रवासी चुकीच्या मार्गाने मक्का गाठतात. या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने हजारो नोंदणी नसलेल्या हज यात्रेकरूंना मक्कातून बाहेर काढले होते. सौदी अरेबिया अधिकाऱ्यांच्या मते, हवामान बदलाचा मक्कावर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर 10 वर्षांनी 0.4 अंश सेल्सिअसने वाढत आहे. गेल्या वर्षी 240 हज यात्रेकरूंचा हजला मृत्यू झाला होता. यातील बहुतांश इंडोनेशियातील होते. यावर्षी सुमारे 18 लाख हज यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी 16 लाख लोक इतर देशांतील आहेत.