Unsung Hero : स्वातंत्र्यासाठी यांनी पण लावली प्राणांची बाजी, इतिहासात हरवलेले हे ‘नायक’ तुम्हाला माहिती आहेत का?

| Updated on: Aug 15, 2024 | 12:09 PM

Forgotten Heroes of Indian Independence : भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञात अनेक समिधा पडल्या. अनेकांनी प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. अनेक चेहरे इतिहासाच्या न उलगडलेल्या पाना आड कायमचे दडले गेले. कोण आहेत हे स्वातंत्र्याच्या इतिहासात हरवलेले 'नायक'?

Unsung Hero : स्वातंत्र्यासाठी यांनी पण लावली प्राणांची बाजी, इतिहासात हरवलेले हे नायक तुम्हाला माहिती आहेत का?
स्वातंत्र्यांच्या काळातील विसरलेले नायक
Follow us on

भारताने स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षे उलटून गेले. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या राष्ट्रीय सणाचा उत्साह संपूर्ण देशात ओसंडून वाहत आहे. पण त्यामागे लाखो भारतीयांचे बलिदान, संघर्ष आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याला स्वातंत्र्य हे काही सहजा सहजी मिळालेले नाहीत. अनेक जणांनी त्यासाठी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य संग्रामीतील अनेक चेहरे आपल्याला माहिती आहेत, पण इतिहासाच्या न उलगडलेल्या पानातील हे नायक आपण विसरायला नकोत.

गंगादिन मेहतर, 1857 उठावातील जननायक

गंगादिन मेहतर यांना गंगू कुस्तीपटू म्हणून ओळखले जायचे. काही जण त्यांना गंगू बाबा म्हणून हाक मारायचे. नानासाहेब पेशवेच्या सैन्यात ते मोठ्या हुद्दावर होते. देशात इंग्रजांविरोधात सर्वात मोठा 1857 उठाव झाला. गंगू बाबांनी इंग्रजांविरोधात मोर्चा सांभाळला. इंग्रजांनी त्यांना बंडखोर म्हणून जाहीर केले. कानपूर येथे लढाई झाली तेव्हा गंगू बाबांनी एकट्याने 200 ब्रिटिश सैनिकांना यमसदनी पाठवले. इंग्रजांनी त्यांचा मोठा धसका घेतला. त्यांना फितूरीने पकडण्यात इंग्रजांना यश आले. 8 सप्टेंबर 1859 रोजी त्यांना सार्वजनिकरित्या फासावर लटकवण्यात आले. भारताच्या भूमिला वीरांच्या बलिदानाची महती आहे. त्यांचे बलिदान कधीच वाया जाणार नाही. ही भूमी एकदिवस मुक्त होईल, असे त्यांनी फासावर जाण्यापूर्वी जाहीर केले होते.

हे सुद्धा वाचा

मातंगिनी हाजरा; भारत छोडो आंदोलनातील ज्वाला

मातंगिनी हाजरा या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील वीरांगणा होत्या. 19 ऑक्टोबर 1870 रोजी त्यांचा जन्म झाला. त्या लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाल्या होत्या. भारत छोडो आंदोलनात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. गांधीजींच्या सहवासात असल्याने त्यांना ‘गांधी बुरी’ अशी उपाधी मिळाली होती. त्याचा अर्थ गांधींजींची जुनी अनुयायी असा होतो. 1905 मध्ये त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. 1932 मध्ये असहकार आंदोलनात त्या सक्रिय होत्या. अनेकदा त्यांना अटक झाली. तुरुंगवास झाला. भारत छोडो आंदोलनात इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला. त्यात 29 सप्टेंबर 1942 रोजी त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली.

कनक लता बरुआ; इंग्रजांनी ललकारणारी वाघीण

कनक लता बरुआ यांची इंग्रजांना धास्ती वाटत होती. अवघ्या 17 वर्षांच्या या तरुणीने इंग्रजांची झोप उडवली होती. मृत्यूचे तीला कधी भीतीच वाटली नाही. स्वातंत्र्यासाठी तीने प्राणांची बाजी लावली. मृत्यू वाहिणी ही त्याकाळी आसाममधील तरुणाईंची ताईत असलेली संस्था होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणाला न घाबरणाऱ्या युवक-युवतींची ही संघटना होती. जवळच्याच एका पोलीस ठाण्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी मृत्यू वाहिणी तयार झाली. त्यात उंच झाडे घेतलेल्या कनक लता बरूआ यांच्यावर इंग्रजांनी गोळी झाडली. 20 सप्टेंबर 1942 रोजी ही घटना घडली.

चापेकर बंधू; वॉल्टर चार्ल्स रँडची हत्या करणारे वीर बंधू

चाफेकर बंधू यांच्य शौर्यगाथेने ब्रिटिश पार्लमेंट पण हादरली होती. त्यांनी जे काही केले, त्याने इंग्रजांना भारतीयांच्या ताकदीचा पूर्ण अनुभव आला. पुण्यात 1896 मध्ये प्लेगची साथ पसरली. वॉल्टर चार्ल्स रँड या सनदी अधिकाऱ्याची प्लेग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण त्याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. प्लेगच्या साथीच्या नावाखाली मनमानी केली. अनेक कुटुंबांना वेगळे केले. वैयक्तिक मालमत्तांचे मोठे नुकसान केले. जनता बेहाल झाली. त्याचा बदला म्हणून अखेर चाफेकर बंधूंनी साथीदारांच्या मदतीने रँडचा खून केला. त्यावेळी गोंद्या आला रे अशी हाक देण्यात आली. ती इतिहासात प्रसिद्ध आहे. 22 जून 1897 साली ही घटना घडली. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली.