लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध नाही, आता इंडिया आघाडीने बिर्लांसमोर के.सुरेश यांना उभे केले

| Updated on: Jun 25, 2024 | 3:35 PM

यंदा आजवरचा प्रघात मोडला जाणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. तर या सर्वोच्च पदासाठी देखील आता निवडणूक होणार आहे. कारण इंडिया आघाडीने देखील आपला उमेदवार उभे करीत सरकारला आव्हान दिले आहे. लोकसभेत अनेक वर्षांनी विरोधकांची संख्या वाढल्याने हे घडले आहे.

लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध नाही, आता इंडिया आघाडीने बिर्लांसमोर के.सुरेश यांना उभे केले
om birla and k.suresh
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा अध्यक्ष पदासाठी एनडीएने पुन्हा ओम बिर्ला यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. खरेतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होत असते. परंतू आता प्रथमच विरोधकांनी देखीलस या पदासाठी आपल्या उमेदवाराला ( कॉंग्रेस खासदार के.सुरेश ) उभे करीत सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे या महत्वाच्या पदासाठी चुरस झाली असून एनडीएच्या पुढे आता ओम बिर्ला यांना निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कालपासून सुरु झाले आहे. 3 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी देखील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 262 खासदारांनी शपथ घेतली होती. मंगळवारी दुपारी 3 ते 4 दरम्यान राहुल गांधी, अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्यासह 270 खासदार लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली होती. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ओम बिर्ला यांना पुन्हा एनडीएने संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये देखील ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष झाले होते.

उपाध्यक्ष पद विरोधकांना दिले नव्हते !

लोकसभा अध्यक्ष पदासाठी यंदा प्रथा मोडून निवडणूक होत आहे. या पदासाठी आता बिनविरोध निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस आठ वेळा खासदार झालेल्या के.सुरेश यांना या पदासाठी उभे करीत असल्याचे आज जाहीर झाले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची आज रात्री ८ वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी यासंदर्भा बैठक होऊन रणनिती ठरविण्यात येणार आहे. ‘खरं सांगू, मी कोणाशीही चर्चा केलेली नाही, लोकसभा अध्यक्ष पद पक्षाकडेच जाते, असा नेहमीचा प्रघात आहे. उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाकडे जायचे, पण गेल्या 10 वर्षांपासून आणि मोदी सरकारच्या काळात जास्त जागा मिळाल्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष पद विरोधकांना देण्यास नकार दिला आहे. आमची इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा झाली, त्यात अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड व्हावी, असे मी सुचवले आहे, सभापतीपद बिनविरोध व्हावे, यावर आम्ही सहमत आहोत. हा संदेश सरकारला द्या. या सोबतच उपसभापतीपद विरोधकांना द्यावे, अशी सूचनाही मी केली असे राष्ट्रवादीचे नेते शदर पवार यांनी सांगितले आहे.

बिनविरोध निवड करण्याच्या वाटाघाटी फसल्या

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या बाजूने प्रस्तावावर एनडीएच्या नेत्यांनी आज स्वाक्षरी केली. सरकार आणि विरोधकांमध्ये स्पीकरबाबत एकमत झालेले नाही. एनडीए पाठोपाठ आज इंडिया आघाडीनेही सभापतीपदासाठी आपला उमेदवार उभा केला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. कालपासून आजपर्यंत मी त्याच्याशी तीन वेळा बोललो आहे असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

खासदारांनी मातृभाषेतून शपथ घेतली

देशाच्या विविध भागातून निवडून आलेल्या खासदारांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतसह मातृभाषेतून शपथ घेतली. पहिल्या दिवशी दिवंगत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांच्यासह 16 खासदारांनी संस्कृतमध्ये पदाची शपथ घेतली. बिहारच्या दरभंगा आणि मधुबनी येथून आलेल्या खासदारांनी डोक्यावर पग बांधून मैथिली भाषेत शपथ घेतली. त्याचवेळी दक्षिणेतील अनेक खासदारांनी पारंपारिक वेशभूषेत सदस्यत्वाची शपथ घेतली. बुधवारी संसदेत नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर, राष्ट्रपती गुरुवारी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. प्रोटेम स्पीकरच्या नियुक्तीशिवाय, विरोधकांनी NEET-UG पेपर लीक आणि अन्य स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्याप्रकरणी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, ज्यामुळे सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची ताकद

इंडिया आघाडीचे खासदार शक्तीप्रदर्शनासाठी काल संसदेच्या संकुलात जमले होते. त्यांच्या हातात संविधानाच्या प्रती होत्या आणि “लोकशाही वाचवा” च्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकचे टीआर बालू यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते संसदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील होत्या. संविधानाची प्रती हातात धरून त्यांनी ‘संविधान चिरंजीव’, ‘आम्ही संविधान वाचवू’, ‘आपली लोकशाही वाचवू’ अशा घोषणा दिल्या.

काय म्हणाले राहुल गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावर हल्ला केला असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. हा हल्ला आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच आम्ही संविधान हातात धरून शपथ घेतली. आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचत असून भारताच्या संविधानाला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही आणि आम्ही तिचे रक्षण करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.