महिला प्रवाशांसाठी एसटीची ‘जागा दाखवा’ मोहीम..!

| Updated on: Aug 18, 2024 | 1:22 PM

एकीकडे सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत असताना दुसरीकडे महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने महिला प्रवाशांचा सन्मान राखावा याचे भान देणारी 'जागा दाखवा' मोहीम सुरु केली आहे.

महिला प्रवाशांसाठी एसटीची जागा दाखवा मोहीम..!
msrtc jaga dakhawa campaign
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

राज्य सरकारने महिलांसाठी एसटीच्या बसमध्ये तिकीट दरामध्ये 50% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये महिला सन्मान योजना अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ‘सन्मान’ देखील केला पाहिजे! या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने ‘जागा दाखवा’ हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक बसस्थानकावर, समाजमाध्यमाच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफिती द्वारे महिलांचा प्रवासादरम्यान सन्मान करावा असा प्रभोधनात्मक संदेश दिला जाणार आहे.

बऱ्याचदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे, लोकलचा प्रवास, एसटीचा प्रवास अशा ठिकाणी महिलांची छेडछाड केली जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या विरोधात आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे! धाडस दाखवलं पाहिजे! त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनी देखील सहकार्य केलं पाहिजे! असा संदेश देणाऱ्या चित्रफिती आजपासून प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत.

योजनांमुळे एसटीचे उत्पन्नात वाढ झाली

एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातच संप लांबल्याने देखील हंगाम वाया गेल्या एसटीची अवस्था अधिकच वाईट झाली होती. परंतू सरकारने आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना आणल्याने 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत सवलतीचा फायदा झाला. त्यानंतर महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास योजनेमुळे एसटीपासून दूर गेलेले प्रवासी पुन्हा एसटीतून प्रवास करु लागले. सध्या दररोज एसटीने 50 लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच  सवलतीची भरपाई सरकार निधी देऊन करीत असल्याने एसटीचे उत्पन्न वाढले आहे.