लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जागावाटपावरून आता सत्तेत असलेल्या महायुती आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार गटाने जितक्या जागा एकनाथ शिंदे यांना दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हालाही पाहिजेत अशी मागणी केलीये. त्याआधीसुद्धा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 80 ते 85 जागांची मागणी केली होती. अशातच आता महाविकास आघाडीमधील शरद पवार गटानेही तितक्याचा जागांची मागणी केली आहे.
शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये 85 जागांची मागणी केली आहे. शरद पवार यांचा 85 वाढदिवस येत्या डिसेंबर महिन्यामध्ये येत असल्याने त्यांना 85 आमदार आपण द्यायचे असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी म्हणून काम करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या आहेत. रोहित पवारांनी आपल्या भाषणात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हद्दपार होणार असल्याचं म्हटलं आहे.
पवार साहेब आपलं ब्रह्मास्त्र आहेत. सामान्य माणसाला अडचण येत तेव्हा ते शरद पवारांकडे पाहतात. पवारसाहेब फक्त व्यक्ती नाही ते एक लढण्याचा हा विचार आहे.असे काही नेते असतात जे दोन दगडावर पाय ठेवून असतात. त्यांना सांगायचं आहे इकडे तरी या नाहीतर तिकडे तरी जा. नीटचा विषय असेल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील ते सोडवणे गरजेचे असल्याचं रोहित पवार म्हणाले. पक्षफुटीनंतर पक्षाचा वर्धापनदिन दोन्ही गटांनी साजरा केला. शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस कशी वाटाघाटी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या अनेक मतदारसंघात तिन्ही पक्षांमध्येच लढाई रंगलेली आहे. त्यामुळे यावर महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार काय तोडगा काढतात आणि पुढे कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.