वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘आरक्षण बचाव यात्रा’ प्रकाश आंबेडकर काढणार आहेत. या यात्रेत ओबीसी नेते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांना घेणार का? असा प्रश्न आंबेडकरांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. तेव्हा आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. भुजबळांना यायचं असेल यावं. मुंडेंनी यायचं असेल यावं, हाके आणि वाघमारे यांनीही यावं. कुणालाही दरवाजे बंद नाहीत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. 25 जुलैला दादरच्या चैत्यभूमीतून या यात्रेला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. यानंतर 7 किंवा 8 ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता होणार आहे.
आरक्षणावर राजकारण नाही. आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. स्वबळावर लढणार. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे यांचं आंदोलन गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे. ते जरांगे यांना पाठिंबा देत आहे. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचं आंदोलन कुठे जाईल, कसं जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलनं ही श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झालं पाहिजे. आंदोलन भरकटलंय असं म्हटलं नाही. म्हणणार नाही. पण जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, ३१ खासदारांसोबत आहेत की गरीब मराठ्यांसोबत आहेत याचा विचार करावा लागणार आहे, असं आंबेडकरांनी म्हटलंय.