24 वर्षांच्या मुलाला कंत्राट कुणी दिलं, त्याला पळून जायला…; राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंचे परखड सवाल

| Updated on: Aug 28, 2024 | 1:30 PM

Aditya Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते राजकोट किल्ल्यावर पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

24 वर्षांच्या मुलाला कंत्राट कुणी दिलं, त्याला पळून जायला...; राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंचे परखड सवाल
आदित्य ठाकरेंची आक्रमक प्रतिक्रिया
Image Credit source: ANI
Follow us on

सिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात आला होता. डिसेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मात्र अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळला. यावरून महाराष्ट्रभरात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचलेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारला काही सवाल केलेत. 24 वर्षांच्या मुलाला कंत्राट कुणी दिलं? असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डागडुजीसाठी जूनमध्ये पत्र गेलं होतं. अवघ्या सहा महिन्यात पुतळा निकृष्ट असल्याचं दिसलं. आपटे नावाचा मुलगा कुठे आहे. तो फरार कसा झाला. काल एक निर्लज्ज मंत्री आला आणि म्हणाला यातून चांगलं काही तरी घडेल. महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. पुण्यताील घटना असेल. बदलापूरमध्ये दहा दिवसानंतर एफआयआर घेतला. महाराजांचा पुतळा पडला. भ्रष्टाचारी सरकार आहे. महाराजांनाही हे सरकार सोडत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

पुतळ्यात भाजप चोरी करू शकतात हे अकलनाच्या पलिकडे आहे. हे व्हायला नको होतं. जगात अनेक पुतळे आहेत, जे समुद्र किनारी आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा १३८ वर्ष जुना पुतळा आहे. आपटे आहे कुठे, त्याला कुणी पळून जाला मदत केली. तो फरार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

राजकोट किल्ल्यावर राडा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिथं शिवरायांचा हा पुतळा होता. त्या ठिकाणी जात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाहणी केली. जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे इतर नेते यावेळी उपस्थित होते. त्याचवेळी नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावर पोहोचले. तिथे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. राजकोट किल्ल्यावर जात असताना पोलिसांनी नारायण राणे यांना अडवलं. महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर असतानाच आपण जाऊ नये. थोड्या वेळात आपणास जायची परवानगी देतो, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. मात्र राणे समर्थकांनी यावेळी राडा केला.