गुणरत्न सदावर्ते वरळीतून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना कडवं आव्हान

| Updated on: Oct 03, 2024 | 10:02 AM

गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. "मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार", असा निर्धार सदावर्ते यांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्ते वरळीतून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना कडवं आव्हान
Follow us on

Gunaratna Sadavarte Worli Constituency : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते, तशा राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झालं आहे. तर काही उमेदवारांकडून प्रचारही सुरु करण्यात आला आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. “मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असा निर्धार सदावर्ते यांनी केला आहे.

“आदित्य ठाकरेंचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”

गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबद्दलची मोठी घोषणा केली. “वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचवल्या आहेत. मी जर वरळीतून लढलो, तर 25 हजाराहून अधिक मताधिक्याने लीड घेईन. तसेच आदित्य ठाकरे यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

महायुती माझा नक्कीच विचार करेल

“माझं केवळ एवढेच म्हणणं आहे की मी शरद पवारांना घाबरलो नाही, मी कधी ठाकरेंना घाबरलो नाही. त्यांना असं उडवून लावलं. त्यामुळे महायुती माझा विचार नक्कीच करेल. वरळीतील जिजामाता नगरमध्ये असलेल्या 8000 झोपडीवासियांचा मी विकास करेन. त्यांना 600 स्क्वेअर फुटाचे घर देणार आणि एक मोठं रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार करणार”, अशी मोठी घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

“शिवनेरी सुंदरी योजना काढू नये”

“भरत शेठ गोगावले यांना केवळ एवढेच सांगेल की त्यांना वेळ फार कमी आहे. त्यामुळे जर एसटी महामंडळामध्ये त्यांना क्रांती करायची असेल, तर त्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यांनी आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. ज्या छोट्या मोठ्या कारवाया आमच्या कंडक्टरवर होतात, तो सगळा जीआर त्यांनी हाणून पाडावा. आमच्या महिला या सशक्त आहेत या भिमाईच्या स्वरूप आहेत. रमाईच्या स्वरूप आहेत. माता जिजाऊच्या स्वरूप आहेत. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता त्यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे”, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.