85-85-85 चा फॉर्म्युला आला कुठून? कुणी केली मध्यस्थी?, बैठकीत काय काय घडलं?; संजय राऊत स्पष्टच बोलले

| Updated on: Oct 24, 2024 | 11:40 AM

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

85-85-85 चा फॉर्म्युला आला कुठून? कुणी केली मध्यस्थी?, बैठकीत काय काय घडलं?; संजय राऊत स्पष्टच बोलले
Follow us on

विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी 288 जागा लढणारच आहे. काल नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, मी आम्ही सर्वांनी पवार साहेबांची भेट घेतली. साधारण 85 जागांची आपली बोलणी नक्की झाली आहेत. ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवरती मित्रपक्ष, इतर काही ठिकाणांवर चर्चा सुरु आहेत. त्यावर आज संध्याकाळपर्यंत निकाल घ्यावाच लागेल. फार घोळ घालून चालणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

शेवटच्या क्षणीही मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकते. ती होणं गरजेचं असतं, त्यावरही चर्चा सुरू आहे. त्यामुळे 85-85ची बेरीज चुकली याच्यात कशाला जाता? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. महाराष्ट्रात आम्ही 175 जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे. राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून मविआमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्याच संदर्भात संजय राऊतांनी बोलताना हे विधान केलं.

काही ओव्हर्स अजून बाकी , आम्ही सेंच्युरी मारू

2019 साली सांगोला, परांड्यात शिवसेनेचे उमेदवार जिंकू आले आहेत, त्यावर अजून चर्चा सुरू आहे. प्रत्येक जागेवर माध्यमांमध्ये चर्चा करता येत नाही. आम्ही सेंच्युरी मारू ना, कारण अजून काही ओव्हर्स शिल्लक आहेत. आम्ही आता 85 पर्यंत आलोय, सेंच्युरीसाठी 15 बाकी आहेत. दोन सिक्सर्स आणि एक फोर मारली की सेंच्युरी होईलच ना. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. वानखेडेवर कोण कधी सेंच्युरी मारेल सांगता येत नाही असं वक्तव्यही राऊत यांनी केलं.

महायुतीतील पक्ष रोज जिलबी खायला बसतात का ?

काँग्रेस आणि शिवसेना ( उबाठा) गट यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. मात्र संजय राऊत यांनी हे दावे साफ फेटाळून लावले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजिबात कोणतेही वाद नाहीत. तसं असेल तर मग महायुतीतील घटक पक्ष रोज सकाळी सागर बंगल्यावर जिलब्या खायला बसतात का ? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला. आघाडीमध्ये-महायुतीमध्ये तीमन प्रमुख पक्ष असतील, तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाची ताकद असते. आणि ती जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येकजण शवेटपर्यंत तिथे आपापली भूमिका मांडत असतात. याचा अर्थ टोकाचे मतभेद आहेत, असा होत नाही, असे सांगत राऊतांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या.