वांद्रे टर्मिन्सवर चेंगराचेंगरी कशी झाली? पहाटे नेमकं काय घडलं? रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती

| Updated on: Oct 27, 2024 | 11:18 AM

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी आणि सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी संयमाने ट्रेनमधून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

वांद्रे टर्मिन्सवर चेंगराचेंगरी कशी झाली? पहाटे नेमकं काय घडलं? रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती
वांद्रे टर्मिन्स
Follow us on

Bandra Terminus Stampede Details : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रे टर्मिन्सवर झालेल्या चेंगराचेंगरीत जखम झालेले बहुतांश प्रवाशी हे उत्तर भारतीय आहेत. हे सर्वजण छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना आज सकाळी अपघात घडला. सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा अजून तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

वांद्रे टर्मिन्सजवळ झालेल्या चेंगराचेंगरीनंतर टीव्ही 9 मराठीने पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी बातचीत करताना या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रवाशांना महत्त्वाचे आवाहनही केले आहे.

वांद्रे टर्मिन्समधून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस ही गाडी आज सकाळी ५.१५ वाजता वांद्रे टर्मिन्समधून सुटणार होती. ही गाडी मध्यरात्री २.४४ मिनिटांनी यार्डात आली. त्यानंतर ही गाडी वांद्रे टर्मिन्सकडे येत असताना काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.

या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन प्रवाशांना केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी आणि सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी संयमाने ट्रेनमधून प्रवास करावा. कोणीही चालत्या गाडीत चढू नये, असेही ते म्हणाले.

2 जणांची प्रकृती गंभीर

तर मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5.56 वाजता वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 22921 वांद्रे गोरखपूर ही एक्सप्रेस लागलेली होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. त्यात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

अरविंद सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

वांद्रे टर्मिन्समध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “गेल्या चार- पाच वर्षांपासून रेल्वेच्या अपघाताच्या नोंद करायला हवी. यात झालेले मृत्यू, चेंगराचेंगरी, जखमी या सर्व गोष्टी आहेत. पण यातही जातीयवादी राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. रेल्वे मंत्रीपद सांभाळणारे वैष्णव हे प्रवाशांना होणारा त्रास, यातना याकडे कायमच दुर्लक्ष करतात. यात सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे सर्व खासगीकरण सुरु आहे. रेल्वेचे खासगीकरण केल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेची वाट लागली आहे. किती तरी अपघात झाले, तरी हा माणूस त्याच जागेवर.. एक मृत्यू झाल्यानतंर राजीनामा देणारे रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री कुठे आणि असंख्य लोकांचे मृत्यू झाल्यानंतर निर्ढावलेल्या पद्धतीने गेंड्याच्या कातडीने काम करणारे हे सरकार त्यांचे हे सर्व मंत्री”, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

“हे सर्व माजोरडे अधिकारी आहेत. पश्चिम रेल्वे असो किंवा मध्य रेल्वे असो हे सर्व माजोर अधिकारी आहेत. ते उर्मट वागतात. त्यांना अभय देण्यात आले आहे. भाजपचेचे अधिकारी तिथे बसलेले आहेत. इतक्या दुर्घटना झाल्यानंतर एखादा जनरल मॅनजर बदलला, त्याच्यावर कारवाई केली, असं काहीही सरकारने केलेलं नाही. त्यांना माहितीये आमचं कोणीही वाकडं करु शकणार नाही. दाढीवाल्यांच्या भाषेत आमच्याकडे महाशक्ती आहे. त्यांना जराही लाज वाटत नाही. ही तुमच्या विकासाची फळं आहेत”, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला.