मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात उमेदवार उभे करून सत्ताधारी आमदारांना पाडण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. अशातच भाजपच्या नेत्याना मनोज जरांगेंची भेट घेतली आहे आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात भाजप नेत्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगेंची भेट घेत त्यांनी बीड शहरातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. रमेश पोकळे यांनी भाजपकडून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता रमेश पोकळे आता बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत.
रमेश पोकळे हे मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना रमेश पोकळे यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. भाजपमध्ये अन्याय केला जातो. अनेक वर्षे काम करूनही संधी दिली जात नाही. भाजपमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावरून खदखद आहे. लोकांसाठी काम करणाऱ्यांना मान सन्मान मिळत नाही. इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पदं दिली जातात. मागच्या पाच वर्षात ही पदं देण्याचं काम झालं. मात्र पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना डावललं जात आहे, असं रमेश पोकळे म्हणाले.
2019 पासून मी मराठा चळवळीत काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात आमचा सहभाग आहे. समाजाचे काही प्रश्न फडवणीस यांनी सोडवलेत. परंतु मराठा समाजाला दिलेले शब्द बाबत शासनाकडून चाल ढकल होत आहे. मी ते उघड्या डोळ्याने बघत आहे, असं टीव्ही 9 मराठीशी बोलताना रमेश पोकळे म्हणाले आहेत.