बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय आणला खेचून, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तरी कोण?

| Updated on: Jun 05, 2024 | 4:49 PM

Beed Bajrang Sonawane : बीडमध्ये ऐनवेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. बीडमधील धक्कादायक निकालाने भाजपच्या मराठवाड्यातील बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला.

बीडच्या हायहोल्टेज लढतीत विजय आणला खेचून, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तरी कोण?
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा राज्यातील निकाल अनेक अर्थांनी धक्कादायक होता. त्याचे विश्लेषण, पराभवाची कारणं यावर आता मंथन सुरु आहे. पण बीडमधील उलटफेरामुळे भाजपला जबर धक्का बसला आहे. बीड हा भाजपचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता. गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता. त्याचे त्यांनी अनेकदा नेतृत्व केले होते. पण या गडाला सुरुंग लावण्यात बजरंग बाप्पा सोनवणे यांना यश आले. यावेळी तर सर्व समीकरणं जुळालेली असताना अचानक बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत उडी घेतली आणि विजयश्री खेचून आणला.

गेल्या निवडणुकीत झाला होता पराभव

2019 मधील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे असा सामना रंगला होता.त्यावेळी खरी लढत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगला होता. त्यावेळी पण सोनवणे यांनी तगडी फाईट दिली होती. सोनवणे हे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचे नेते मानले जात. गेल्या लोकसभेत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता.

हे सुद्धा वाचा

अजित पवार गटात

येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला. धनंजय मुंडे आणि नंतर अजित पवार यांच्या ते जवळ आले. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार गटात होते. पण निवडणुका जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. बीडमधील सभेत अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. बीडची लढत एकतर्फी होईल, असा अंदाज लावण्यात येत होता. तो बजरंग सोनवणे यांना खोटा ठरविला.

कमी कालावधी उरलेला असताना त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने त्यांना भक्कम बळ दिले. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्याचा पण त्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघात हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचे दिसून आले. शेवटपर्यंत चुरशीच्या चाललेल्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी पकंजा मुंडे यांचा पराभव केला.