…तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचंय; मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा

| Updated on: May 16, 2024 | 5:37 PM

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde Pankaja Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

...तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचंय; मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा
Follow us on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या बीडमध्ये आहेत. बीडमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री तसंच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नारायण गडावरील सभा पुढे ढकलली. त्यामुळे आता मी लगेच उपोषण सुरू करणार आहे. उपोषणाचा निर्णय चार जून आधीच होणार आहे. मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत. पण तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू- भगिनीला इशारा दिलाय.

मुंडे बंधू- भगिनीवर टीका

मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू, असं म्हटलं जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असं देखील म्हटलं जात आहे. परंतु मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावं की मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही, तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

8 जूनला बीडच्या नारायणगड इथं होणारी सभा पुढे ढकलली आहे. आता त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलली गेल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर भाष्य

बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट इथं झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. त्यांची भेट त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे. तो आता निवडणुकीनंतर होणं, मला अपेक्षितच होतं. मराठा मताची यांना गरज आहे. परंतु मराठा समाज बांधवांची यांना गरज नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.