Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं, भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

| Updated on: May 30, 2024 | 11:05 AM

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. . मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप भलतंच आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं, भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप भलतंच आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आव्हाडांविरोधात असून गुरूवार सकाळपासूनच राज्यभरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे एकंदर वातावरण खूपच तापलेलं दिसत आहे. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून काही ठिकाणी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

राज्यभरात निदर्शने

कालच्या या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हांडाविरोधात आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. भाजप नेते, कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, निषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत. ठाण्यातील वसंत विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले तर कोल्हापुरातही जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्यावतीने बिंदू चौकात निदर्शने करण्यात येत आहेत. बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करत हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच त्या ठिकाणीच आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात येत आहे

संगमनेरमध्ये गुन्हा दाखल

या प्रकरणी काल आव्हाड यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते, आता आजही त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आव्हाडांविरोधातस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर भाजप अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष विकास जाधव यांच्या तक्रारीनंतर कलम 504 अन्वये गुन्हा दाखल झाला. शांततेचा भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपकडून ही तक्रार करण्यात आली होती. तर आव्हाड यांच्या विरोधात रायगडमध्ये दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आव्हाडांच्या अटकेची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माफीदेखील मागितली. मात्र केवळ भाजपच नव्हे तर इतर नेतेही या मुद्यावरून आक्रमक झाले असून आव्हाडांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून राष्ट्राचा अवमान केला, त्यांची ही चूक अक्षम्य आहे. त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. २४ तासांच्या आव्हाडांनी माफी मागितली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन होईल असा इशारा विरोधकांनी दिला.

जे कृत्य त्यांनी महाडमध्ये केले, त्यानंतर आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित परांजपे यांनी केली.

रामदास आठवलेंनीही केली अटकेची मागणी

या कृतीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. मी त्यांचा निषेध करतो. आव्हाड यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी. त्यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली .

प्रकाश आंबेडकरांनी केला निषेध

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. मी कितीही लोकशाहीवादी आहे , निरपेक्ष आहे, असे आव्हाड म्हणत असले, त्यांनी कितीही दवंडी पिटली असली तरी माझं त्यांना एकच सांगण आहे की आव्हाडांनी आधी मनातून मनुस्मृती काढून टाकावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.