आतली बातमी, विरोधकांच्या नरेटीव्हची भाजपला भीती, जोरदार खलबतं, नेमकं काय ठरलं?

| Updated on: Jun 14, 2024 | 5:22 PM

भाजपच्या गोटातील एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप पक्ष आता सतर्क झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तसं काही घडू नये यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीसाठी भाजपच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

आतली बातमी, विरोधकांच्या नरेटीव्हची भाजपला भीती, जोरदार खलबतं, नेमकं काय ठरलं?
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

विरोधकांच्या नरेटीव्हची भाजपला भीती आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधक नरेटीव्ह सेट करण्यात यशस्वी ठरल्याने भाजपने आता धसका घेतला आहे. विरोधकांचा हाच नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभर फिरणार आहेत. विरोधकांचा नरेटिव्ह कसा खोटा आहे हे भाजप नेते आता जनतेला सांगणार आहेत. भाजप नेते आता राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरा करणार आहेत. संविधान बदलणार या विरोधकांच्या नरेटिव्हला आता भाजप उत्तर देणार आहे. याबाबत भाजपच्या आजच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

“भाजपच्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने काम सुरू केलं आहे. मोदीजींच्या अभिनंदनाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाबद्दल ठराव मांडण्यात आला. गरीब कल्याणाच्या योजना तळागळात पोहोचविण्यासाठी भाजप काम करत आहे. नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. महायुतीचे उमेदवार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आजची बैठक पार पडली”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

‘पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू’

“देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वस्त केलं की आपली संघटना महाराष्ट्रातील जनतेला मविआच्या मायावी शक्तीतून, खोट्या नरेटिव्हमधून बाहेर काढणार आहे. मोदींनी संविधान सर्वोच्च असल्याचं अधोरेखित केलं आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निर्माण केलेलं भय दूर करण्याचं काम मोदींजींनी केलं. आम्ही आदिवासी, मागास लोकांमध्ये जाणार आहोत. महिलांना खटाखट पैसे देऊ. काँग्रेसने म्हटलं होतं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवू. 48 नेते 48 लोकसभेत जाणार आहेत. जनतेचा कौल मान्य आहे. पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू. राज्यात घरोघरी जाणे, नवमतदारांची नोंदणी, कन्फ्युज झालेल्या जनतेचा संभ्रम दूर करु”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

‘स्मार्ट मीटरचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला’

“विरोधकांकडून स्मार्ट मीटरवरुन जाणूनबुजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चुकीचं नरेटीव्ह केलं जात आहे. इडस्ट्रीयल मीटर हेच स्मार्ट मीटर लागणार आहे. जोपर्यंत जनतेचं सहमत होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही. पण स्मार्ट मीटरचा निर्णय हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तेव्हाचे काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण केलं पाहिजे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या प्रती आम्ही देणार आहोत. पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, घरगुती आणि कमर्शियल, जे छोटे ग्राहक आहेत, मध्यमवर्गीय ग्राहक आहेत, याऐवजी केवळ इंडस्ट्रील ग्राहक , ज्या ठिकाणी नुकसान आहे, त्या ठिकाणी ते सांगतील, ते त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे आमच्या बैठकीत जे झालं ते आम्ही तुम्हाला सांगितलं आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

‘ती मतं आम्ही पुन्हा वापस घेऊ’

“राज्यातील 38 विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे आमचे सहयोगी अपक्ष आमदार आणि भाजपचे मागच्यावेळी पराभूत झालेले 38 आमदारांच्या मतदारसंघात लीड आहे. आमचे काही मतदारसंघ हे लोकसभेच्या निवडणुकीत कमी दिसत आहेत. पण मला विश्वास आहे, जो खोटारडापणा जनतेत केला त्याचं सत्य समोर येईल. एकवेळा खोटं बोलता येतं. दुसऱ्यांदा खोटं बोलता येत नाही. संविधानाच्या नावाने, आदिवासींचे हक्क आम्ही काढून घेणार या नावाने, शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करुन जे मतं घेतली आहेत ती मतं आम्ही पुन्हा वापस घेऊ”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“महाराष्ट्रात प्रचंड ताकदीने महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल. मोठ्या प्रमाणात मतदारसंघ आहेत, आता ते जनतेला दाखवण्याकरता काही आकडे करत आहेत. पण आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊ. आमचं सरकारदेखील त्या ठिकाणी चांगलं काम करेल. महायुतीचं सरकार शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्या पूर्ण करेल. शेतकऱ्याकरता काम करेल. ज्या ठिकाणी कमी राहिलो त्या ठिकाणी काम करेल. पुन्हा एकदा मराठी जनता समाधानी होईल असं काम सरकार करेल, अशी मला अपेक्षा आहे”, असं चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले.

“रोहित पवार केवळ आकसापोटी आणि त्यांनाही माहिती आहे की, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मजबुतीने काम करत आहे. पुन्हा एकदा हे सरकार येणार आहे. मी रोहित पवार यांच्याबाबत जास्त काही बोलणार नाही. बोलणारे अनेक आहेत. आभाळ फाटलंय असं कुणी मानत असेल तर काही खरं नाही”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.