सावकाराने जमीन हडपली, जगायचं कुणाच्या भरोशावर?, शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

| Updated on: Feb 26, 2023 | 9:00 AM

सावकाराने जमीन हडपली. जगायचं कुणाच्या भरोशावर? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या शेतकऱ्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागला.

सावकाराने जमीन हडपली, जगायचं कुणाच्या भरोशावर?, शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय
Follow us on

बुलढाणा : शेतकरी आजारी होता. उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून वेळेवर अवैध सावकाराकडून उपचारासाठी पैसे घेतले. आजारपणाच्या गरजेपोटी घेतलेली रक्कम व्याजासह सावकाराला परत दिली. त्यानंतरही शेतजमीन सोडून देण्यास सावकराने नकार दिला. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील सुधाकर श्रीराम मिसाळ असं या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव. या ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेवटी विषारी औषध घेतले. आपली जीवन यात्रा संपविली. या घटनेने ग्रामीण भागातील अवैध सावकारीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. शेळगाव आटोळ येथील शेतकरी सुधाकर श्रीराम मिसाळ असे या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. अवैध सावकार शेळगाव आटोळ येथीलच आहे. सावकाराने सुधाकर मिसाळ यांची जमीनही बळजबरीने हडप केल्याची माहिती पुढे येत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातच ठिय्या

या सावकाराविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी. यासाठी मिसाळ यांच्या नातेवाईकांनी आणि शेतकऱ्यांनी चिखली उपजिल्हा रुग्णालयातचं काल सायंकाळी ठिय्या मांडला होता. तर रात्री उशिरा अंधेरा पोलिसांत अवैध सावकार विरुध्द मृतकाच्या पत्नी सिंधुबाई सुधाकर मिसाळ यांनी तक्रार केली. त्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस स्टेशनला अवैध सावकार अनिल दौलत तिडके याच्याविरूध्द कलम ३०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केलाय.

गहाण ठेवलेली जमीन गेले

ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती फारच दयनीय आहे. बँक कर्ज देत असली तर ते मर्यादित असते. वर्षभरानंतर ते परत करावे लागते. त्यात नापिकी आल्यास कर्जाची परतफेड करणे शक्य नाही. अशावेळी मोठा खर्च करण्यासाठी सावकराकडं गेल्याशिवाय पर्याय नाही. सुधाकर मिसाळ यांच्याबाबतही असंच घडलं. ते आजारी होते. उपचारासाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी सावकाराकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतलं.

उपचारासाठी वणवण भटकावे लागते

सामान्य व्यक्तीला सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. दोन-तीन दिवसांच्या औषध दिल्या की डॉक्टरांची जबाबदारी संपते. शस्त्रक्रिया करण्यासाठी खर्च येतो. शिवाय सरकारी रुग्णालयात कित्येक दिवस रिपोर्टसाठी वाट पाहावी लागते. कितीतरी वेळा पायपीट करावी लागते. खासगी रुग्णालयात पैसे खर्च करून जीव वाचवण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सावकाराने जमीन हडपली. जगायचं कुणाच्या भरोशावर? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या शेतकऱ्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागला.