मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 80, अजितदादा म्हणाले 90, पण भाजपच्या आकड्याने सर्व गणितच फिस्कटतंय…

| Updated on: Jul 13, 2023 | 5:39 PM

जागावाटपाची चर्चा होण्यापूर्वीच भाजपने 152 जागांवर आपला दावा सांगून शिंदे गट आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे. त्यामुळे पक्ष बदल केल्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांची पुढील काळात काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 80, अजितदादा म्हणाले 90, पण भाजपच्या आकड्याने सर्व गणितच फिस्कटतंय...
CM EKNATH SHINDE WITH DCM DEVENDRA AND AJITDADA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

भिवंडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील असा अंदाज व्यक्त होत असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी आपल्या आमदारांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 85 जागा लढविण्याचा दावा केला होता. तर, वर्षभरानंतर शिंदे सरकारमध्ये अजित पवार सामील झाले. त्यांनीही बांद्रा येथील एमआयटी येथे कार्यकर्त्याना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढविण्याचाही दावा केला होता. मात्र, भाजपने विधानसभेच्या किती जागा लढणार याचे आकडेच जाहीर केल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटाची पंचाईत झाली आहे.

भिवंडी येथे भाजपच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी भाजपचे राज्यातील सर्व पदाधिकारी, केंद्रीय नेते, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित आहेत. या बैठकीला मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय 2024 चा संकल्प जाहीर केला.

हे सुद्धा वाचा

लोकसभेला मोदींचा विजय पक्का असून देशात 350 प्लस आणि राज्यात 45 प्लस जागा जिंकू. एनडीएची युती पक्की आहे. कुणावरही जागा किंवा कसला परिणाम होणार नाही. शिवसेना किंवा अजित दादा यांच्या जागांवर आमचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप 152 प्लस झालेला आपणाला पहायला मिळेल. तर, महायुती म्हणून 220 प्लस विधानसभेच्या जागा निवडून येतील असा संकल्प केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या बैठकीत भाजपचा स्ट्राईक रेट हा 152 प्लस आणि महायुतीचा 220 प्लस असेल असे म्हणाले असले तरी यामुळे शिंदे गट आणि अजित पवार यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. विधानसभेत आमदारांचे संख्याबळ 288 इतके आहे. त्यातील भाजपने 152 जागा लढविण्याचे ठरले तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला 68 जागा येत आहेत.

भाजपला केवळ 118 जागा?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना प्राप्त परिस्थिती आपला पक्ष वाढविणे महत्वाचे आहेत. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी अनुक्रमे विधानसभेच्या 80 आणि 90 जागा लढविण्याची घोषणा आधीच केली होती. तर या दोन्ही नेत्यांनी 80 आणि 90 जागा लढविल्यास भाजपला केवळ 118 जागा मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा प्रस्ताव

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेला कमी जागा देण्याची तयारी भाजपने केली होती. पण, समसमान जागावाटप या मागणीवर शिवसेना ठाम होती. युतीच्या मित्रपक्षांसाठी 18 जागा बाजूला ठेवून उरलेल्या 270 जागा समसमान वाटू असा शिवसेनेचा प्रस्ताव होता. मात्र, ही मागणी अवास्तव आहे. शिवसेनेची ताकद लक्षात घेता 115 पेक्षा जास्त जागा देऊ नये असा भाजपचा विचार होता.

परंतु, भाजपने त्यावेळी मित्रपक्षांच्या 18 जागांसह 164 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. तर, शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या. आताही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने तीच रणनीती आखली आहे.