“काही लोक फक्त मराठी माणसाचं नाव घेतात, पण…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Feb 25, 2025 | 10:56 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वयंपूर्ण विकास प्रकल्पांसाठी तीन वर्षांसाठी व्याज माफी जाहीर केली आहे. हे मध्यमवर्गीय आणि मराठी माणसांना स्वतःचे घर मिळवण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले. या घोषणेसह त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

काही लोक फक्त मराठी माणसाचं नाव घेतात, पण..., देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
devendra fadnavis uddhav thackeray
Follow us on

आज मी घोषणा करतो स्वयंपूर्ण विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केलं जाईल. तीन वर्षापर्यंत आणि तसंच आपण ठेवला नाही तर तुम्ही बिल्डर सारखं वर्षानुवर्ष चाललाय, वर्षानुवर्ष चालला असं नाही. स्वयंपूर्ण विकासाची इमारत आपण ठरवल्यानंतर पाच वर्षात उभी राहिली पाहिजे. लोकांना तिथे जाता आलं पाहिजे. या दृष्टीने तीन वर्षाकरिता या संदर्भात जी काही व्याजमाफी आहे, ती व्याजमाफी आपण देऊ, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच मुंबईतील कांदिवली परिसरातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वयं पुनर्विकासाबद्दल अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. “गेल्या पंचवीस तीस वर्षात मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईतला मध्यमवर्गीय याला त्याच्या जीवनामध्ये येणं तर सोडाच पण त्याला सातत्याने मुंबईच्या बाहेर जाण्याची वेळ आली. आपण जर मुंबई शहराचा परिस बघितला तर हा शहरातला माणूस मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही तुम्हाला हक्काचे छप्पर देतोय

“काही लोक फक्त मराठी माणसांचे नाव घेत असतात, पण त्यांनी काही ठोस केले नाही. आज मला या गोष्टीचा समाधान आहे की आम्ही त्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर हे या ठिकाणी देऊ शकलो आहे. आम्ही तुम्हाला हक्काचे छप्पर देतोय”, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना लगावला.

स्वयं-पुनर्विकास ऑटो पायलट मोडवर जात नाही, तोपर्यंत…

“भविष्यातील हा माझा संकल्प आहे की जोपर्यंत स्वयं-पुनर्विकास ऑटो पायलट मोडवर जात नाही, तोपर्यंत जेवढे बदल करावे लागतील तेवढे बदल करण्याची माझी तयारी आहे. त्या संदर्भात सगळ्या बाजूला आपण करूया आणि स्वाभिमानानं स्वयंपूर्ण विकासातून या ठिकाणी आत्मनिर्भर अशा प्रकारचा आमचा मुंबईकर हा उभा करण्याचा संकल्प आज मी घेतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईतील समस्यांमधून पियुष गोयल बाहेर काढू शकतात

“केंद्रीय मंत्री असताना एवढा वेळ देखील मिळत नाही पण पीयूष गोयल स्वतः वेळ काढतात. ते इथल्या प्रश्नांमध्ये रस घेतात आणि खरंतर पीयूष गोयल मुंबईमधल्या आमच्या ज्या समस्या आहेत, त्यातल्या अर्ध्या समस्यांमधून तुम्हीच आम्हाला बाहेर काढू शकता. कारण अर्ध्या समस्या आमच्याशी रिलेटेड आहे. नद्या केंद्र सरकारची रिलेटेड आहे. त्यामुळे केंद्र सरकारमध्ये आमचे एक प्रकारे अँबेसेडर म्हणून आपल्याला काम करावे लागेल. मागच्या काळामध्ये आमच्या गोपाळ भाईंनी उत्तर मुंबईचा खासदार म्हणून अतिशय चांगलं काम केलं. आता या उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा विडा हा पियुष भाईंनी उचललेला आहे. मी आपल्याला एवढेच आश्वस्त करतो की महाराष्ट्राचं सरकार हे पूर्णपणे या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्या पाठीशी उभा राहील. यासाठी जे जे करण्याची आवश्यकता असेल तेथे आम्ही करू”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.