हितेंद्र ठाकुर यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली, नेमकी रणनीती काय?

| Updated on: Sep 24, 2024 | 10:27 PM

आमदार हितेंद्र ठाकुरांच्या वसई विधानसभा मतदारसंघाच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून वसई विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

हितेंद्र ठाकुर यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली, नेमकी रणनीती काय?
हितेंद्र ठाकुर आणि नाना पटोले
Follow us on

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर 6 वेळा आमदार असणाऱ्या वसई विधानसभा मतदारसंघाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील हे वसई विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. विजय पाटील हे 2019 नंतर पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकुरांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मागच्या 30 वर्षात सत्ताधारी आमदारांनी केवळ आश्वासन दिली आहेत. आजही वसईकर मूलभूत प्रश्नांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणी, ओवर ब्रिज, नसल्यामुळे येथील जनता त्रस्त आहे. त्यामुळे त्यांना या विधानसभा निवडणुकीत बदल हवा असून, येथील जनता काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देणार, असा विश्वास ही विजय पाटील यांनी tv9 शी बोलताना व्यक्त केला आहे.

कोण आहेत विजय पाटील?

  • विजय पाटील हे वसईतील एक मोठे उद्योजक आहेत.
  • 1995 ते 2009 पर्यंत त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत काम केले आहे.
  • 2002 ते 2007 या कालावधीत ते वसई पंचायत समितीचे सदस्य होते
  • 3 जुलै 2009 ला वसई-विरार महापालिकेची स्थापना झाल्यावर 53 ग्रामपंचायती महापालिकेतून वगळाव्यात यासाठी वसईत मोठे सर्वपक्षीय जन आंदोलन उभे राहिले होते. तेव्हा त्यांनी ठाकुरांची साथ सोडून, वसई जन आंदोलन सोबत उभे राहिले होते.
  • 2012 ते 2014 या कालावधीत विजय पाटील हे ठाणे जिल्हा परिषदमध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद सांभाळले आहे.
  • 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिल्यामुळे, त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या तिकिटावर हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात वसई विधानसभेतून निवडणूक लढवली होती.
  • यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर केवळ 25 हजार 995 मताधिक्य घेऊन विजय पाटील यांचा पराभव केला होता. हितेंद्र ठाकूर यांना 1 लाख 02 हजार 905 तर विजय पाटील यांना 76 हजार 955 मते मिळाली होती.
  • 2019 च्या विधानसभेतील पराभवानंतर विजय पाटील यांनी पुन्हा 2021 मध्ये काँग्रेस घरवापसी केली असून, आज ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.