पूजा खेडकर प्रकरणातील ‘त्या’ कंपनीने थकवला लाखोंचा कर, लवकरच होणार लिलाव?

| Updated on: Jul 27, 2024 | 4:01 PM

पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता. त्यामुळे याप्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती.

पूजा खेडकर प्रकरणातील त्या कंपनीने थकवला लाखोंचा कर, लवकरच होणार लिलाव?
Follow us on

Pooja Khedkar Thermoverita Company Auction : वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणातील थर्मोव्हेरीटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीने अद्याप 2 लाख 72 हजारांचा कर अद्यापही भरलेला नाही. त्यामुळे या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे.

पूजा खेडकर या सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांनी पिंपरी- चिंचवड शहरातील थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देऊन वायसीएम रुग्णालयातून सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे प्रकरण समोर आलं होतं. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिलं होतं. या रेशन कार्डवर याच कंपनीचा पत्ता होता. त्यामुळे याप्रकरणी कंपनीला जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती.

यानंतर आता या कंपनीने कर किती भरला, याची चौकशी करण्यात आली. यावेळी एप्रिल २०२२ पर्यंत या कंपनीने नियमित कर भरलेला आहे. पण या कंपनीचा गेल्या दोन वर्षांचा 2 लाख 72 हजार कर थकीत आहे. याबाबत मार्च महिन्यात जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली आहे. यानंतर आता याबद्दल अधिपत्र बजावण्यात आलं असून त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे.

21 दिवसानंतर मालमत्तेचा लिलाव

जप्तीची नोटीस दिल्यानंतर सात दिवस उलटे की अधिपत्र देण्यात येते. त्याला अधिपत्र ‘ह’ म्हटलं जातं. अधिपत्र बजावण्यात आल्यानंतर २१ दिवसाच्या आत कर भरावा लागतो. यानंतरही जप्तीची रक्कम भरली नाही, तर 21 दिवसानंतर मालमत्तेची विक्री किंवा मालमत्तेचा लिलाव काढला जाऊ शकतो, त्यामुळे सध्या पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनीवर लिलावाची टांगती तलवार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दखल घ्यावी- विजय कुंभार

पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दखल घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. त्यांनी जर दखल घेतली नाही तर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, यासाठी आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहिल आहे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.