राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना गेल्या काही काळात राज्यात घडत आहेत. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत असून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ति अभियान सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. बारामतीमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार ?
मधल्या काळात अतिशय दुर्दैवी घटना घडली . मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने काही पावलं उचलण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शक्ति अभियान’ सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंचशक्ती आहे,असे अजित पवार यांनी सांगितले.
शक्ति बॉक्स – तक्रार पेटी
त्यात शक्ति बॉक्स अशी एक तक्रार पेटी असेल. मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी फोनकॉल असा त्रास काही महिलांना, मुलींना होतो, मात्र त्याबाबत मनमोकळेपणे बोलता येत नाही . तक्रार करण्यास भीती वाटते. त्यांनी आपली तक्रार मांडावी यासाठी परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल , एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन , महिला वसतीगृह,पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ति बॉक्स – ही तक्रार पेटी ठेवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
दोन दिवसांत पोलिसांमार्फत सदर तक्रार पेटी उघडून, त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. संबंधितांचे नावही अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल.
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह – शक्ति नंबरही करणार जारी
शक्ति बॉक्स या तक्रार पेटीप्रमाणे एक शक्ति नंबरही जारी करण्यात येणार आहे. ‘एक क़ॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ‘ या अंतर्गत 9209394917 या नंबरवर कॉल करता येईल. या क्रमाकांची सेवा 24 तास सुरू राहणार आहे. त्यावर फोन करून अथवा मेसेज करून तक्रार केल्यास त्या तक्रारीचं त्वरित निवारण करून, त्यावर योग्य ती कारवाई करण्याची दक्षता घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तींची ओळखह, नावंही गोपनीय ठेवण्यात येतील.
हा नंबर बारामतीमधील शाळा, कॉलेज, सरकारी व खाजगी संस्था , कंपनी, हॉस्पिटल येथे लावून आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल.