“…नाहीतर पेंग्विनची काळजी करत राणीच्या बागेत बसा”, भाजप नेत्याची बोचरी टीका

| Updated on: Oct 18, 2024 | 12:00 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर 1080 एकर जमीन अदानींना दिल्याचा आरोप केला आहे, तर आशिष शेलार यांनी हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.

“…नाहीतर पेंग्विनची काळजी करत राणीच्या बागेत बसा”, भाजप नेत्याची बोचरी टीका
aaditya thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

Dharavi Redevelopment Dispute : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच आता अनेक नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार हे आमनेसामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत. तुम्ही या”, असे आवाहन आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना दिले आहे.

आदित्य ठाकरेंनी धारावी पुनर्विकास योजनेवरुन भाजपवर जोरदार आरोप केले आहे. धारावीत 300 एकर पुनर्विकासाच टेंडर अदानीला दिलंय. मुंबईतील तुमची आमची जमीन अदानीला फुकटात दिलीय. कुर्ला, मढ, देवनार येथील जमिन अदानींना दिलीय. मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. आता आशिष शेलार यांनी या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 1080 एकर आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या, असे आवाहनही दिले आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका !

◆1080 एकर आकडा आला कुठून?

◆अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा.

◆उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही ?

◆उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !!

◆नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा !, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.