डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाकडून उमेदवारी, उद्धव ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड, कोणी केली घणाघाती टीका ?

| Updated on: Apr 04, 2024 | 9:12 AM

इतर पक्षांतून शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा उघडा पडल्याची टीका करण्यात आली आहे.

डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाकडून उमेदवारी, उद्धव ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड, कोणी केली घणाघाती टीका ?
डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाकडून उमेदवारी, उद्धव ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड
Follow us on

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून विविध पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही काल चार उमेदवारांची नाव जाहीर करत मोठी खेळी केली. भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले उन्मेष पाटील यांना जळगावमधून उमेदवारी न देता, त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तर कल्याणमधून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र इतर पक्षांतून शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने शिवसैनिक
चांगलेच नाराज झाले आहेत. डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा उघडा पडल्याची टीका शिवसेना सचिव माजी आमदार प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा धूर्त चेहरा उघड

ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पक्ष कार्य केले अशा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांऐवजी इतर पक्षातून बंडखोरी करून आलेल्या लोकांना संधी मिळाल्याने पावसकर चांगलेच नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. इतर पक्षातील बंडखोर, डुप्लिकेट शिवसैनिकांना उबाठा गटाने उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा उघडा झाला अशा शब्दांत पावसकर यांनी टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले पावसकर ?

निष्ठावान शिवसैनिकांना डावलून उबाठा गटाकडून आयात उमेदवारांना तिकिटे वाटण्याचे काम केले जाते. कल्याण मतदार संघासाठी वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी उबाठा गटाने आज जाहीर केली. वैशाली दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. आज जळगावमधील भाजपचे नेते उन्मेष पाटील, करण पवार यांना आज उबाठा गटाने पक्ष प्रवेश दिला. करण पवार यांना उबाठा गटाकडून जळगावची उमेदवारी दिली आहे. मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले करण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. निवडणुकीच्या तिकिट वाटपात उद्धव ठाकरे कोणत्या थराला जातात, हे यातून दिसून आले, अशी टीका किरण पावसकर यांनी केली.

सांगलीत उबाठा गटाने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांना डावलून अगदी काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्या चंद्रहार पाटील यांना तिकिट देण्यात आले. यवतमाळ वाशिममधील उबाठा गटाचे उमेदवार हे देखील आयात उमेदवार आहेत. अपक्ष आमदार संजय देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वीच उबाठात प्रवेश केला होता. मावळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना डिसेंबर महिन्यात उबाठा गटाने पक्षात घेतले होते. अवघ्या तीन महिन्यात संजोग वाघेरे यांना उबाठा गटाने मावळची उमेदवारी दिली. भाऊसाहेब वाघचौरे यांना पुन्हा उबाठा गटाने पुन्हा पक्ष प्रवेश देत शिर्डीची उमेदवारी दिली.

आयात केलेल्यांना उमेदवारी देऊन शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले

शिवसेनतून २०१४ मध्ये कॉंग्रेस आणि नंतर भाजपमध्ये गेलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांची पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजपने हकालपट्टी केली होती. त्याच वाघचौरे यांना पुन्हा उबाठा गटाने उमेदवारी दिली, असे पावसकर यांनी नमूद केले. ईशान्य मुंबईतून उबाठा गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील मूळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ईशान्य मुंबईचे खासदार होते. उबाठा गटाने आयात उमेदवारांना खासदारीचे तिकिट देऊन निष्ठावान शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. यामुळे उबाठात उरले सुरलेले कार्यकर्तेही जय महाराष्ट्र करतील, असे पावसकर म्हणाले.