विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का; पूर्व विदर्भात माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी

| Updated on: Sep 08, 2024 | 3:54 PM

Gopaldas Agarwal : अजितदादा गटाने पूर्व विदर्भात फिल्डिंग लावली आहे. तर महाविकास आघाडी पण विदर्भात भाजपला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहे. त्यातच गोंदियात मोठी घडामोड घडत आहे. भाजपच्या गोटातून माजी आमदार काँग्रेसमध्ये घरवापसीच्या तयारीत आहेत.

विधानसभेपूर्वीच भाजपला मोठा धक्का; पूर्व विदर्भात माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
पूर्व विदर्भात भाजपला झटका
Follow us on

विदर्भावर भाजपचा वरचष्मा आहे. पण विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडत आहे. महायुतीत अजितदादा गटाने विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर महाविकास आघाडीत शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपला मोठं खिंडार पाडण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसने भाजपला पहिला धक्का दिला आहे. गोदिंया जिल्ह्यात आता समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.

प्रवेशाचा मुहूर्त ठरला

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, येत्या 13 सप्टेंबर रोजी ते काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जेव्हापासून महायुतीचे सरकार आले. तेव्हापासून कार्यकर्त्यांसह गोपाल अग्रवाल नाराज असल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी नाराजी व्यक्त केली. 14 ऑगस्ट रोजी ही बैठक झाली. त्यात जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्यांवर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागून घेतला. पण बैठकीत पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. तातडीने जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इतकेच नाही तर घडलेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये दाखल होती, ही चर्चा रंगली होती.

अशी आहे राजकीय कारकीर्द

गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदवर आमदार तर तीनदा ते विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहे, त्याचा अंदाज घेत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले. आता ते 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना काँग्रेस या विधानसभा मतदारसंघातून तिकीट देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण भाजपची डोकेदुखी वाढली आहे, हे नक्की.