लोकसभेला अपमान झाला म्हणूनच… हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा

| Updated on: Jun 15, 2024 | 1:41 PM

लोकसभेला तिकीट द्यायचे मान्य केलं होतं. राज्यसभेला उमेदवारी नाकारली म्हणून भुजबळ नाराज नव्हते. त्यांची नाराजी असेल तर दूर करू. समाधान करू. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही लवकरच भेटणार आहोत. सर्व नेते एकत्र बसून बोलतील, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

लोकसभेला अपमान झाला म्हणूनच... हसन मुश्रीफ यांच्या विधानाची जोरदार चर्चा
हसन मुश्रीफ यांच्या विधानाची चर्चा
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छगन भुजबळ यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत मनातील खदखद मांडतानाच नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यसभेच्या जागेवरून छगन भुजबळ नाराज नाहीत. लोकसभा निवडणुकीत नाव पुढे येऊनही तिकीट न मिळाल्याने अपमान झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळेच त्यांनी खदखद बोलून दाखवली, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

आमची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली. ते नाराज नाहीत. त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितली होती. पण आम्ही त्यांना समजावलं. तुम्हाला राज्यात राहण्याची आवश्यकता आहे, असं आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं होतं. आपला जो नवीन पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य पक्ष म्हणून उदयाला आला आहे. सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. ओबीसींचे नेते म्हणून तुम्ही चांगले काम करत आहात. त्यामुळे तुम्हाला राज्यात राहायचं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदही तुमच्याकडे आहे, अशा भावना आम्ही व्यक्त केल्या. आमचं म्हणणं ऐकल्यावर ते खूश होते, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

नाराजी नाही, खदखद

काल सुनेत्रा पवार वहिनींचा फॉर्म भरायचा होता. छगन भुजबळ स्वत: वहिनींसोबत होते. ते मीडियाशीही बोलले. दिल्लीवरून त्यांना लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती. पण काही कारणामुळे ती जागा शिंदे गटाची असल्याने शिंदे गटाने देण्यास नकार दिला. माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं नाव जाहीर झाल्यानंतर मिळाली नाही हे होणं बरोबर नाही, असं त्यांना वाटलं. त्यांनी मनातील भावना, खदखद व्यक्त केली. त्यामुळे ते नाराज आहेत, असं म्हणता येणार नाही, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

लोकसभेत अपमान ही खंत

विधानसभेत चांगलं काम करणं. विधानसभेला सांघिकपणाने सामोरे जाणं हा एकच पर्याय आहे. राज्यसभेबाबत ते नाराज नाही. भुजबळ आता विधानसभेत आहेत. मंत्री आहेत. लोकसभेला अपमान झाल्याने त्यांनी राज्यसभेची मागणी केली होती. पण आम्ही समजूत काढली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात अपमान झाला ही त्यांची खंत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तत्त्वांशी फारकत नाही

भुजबळ यांनी कधीच तत्त्वांशी फारकत घेतली नाही. लोकसभेच्या निकाला आधीच त्यांनी 400 पारची घोषणा दिल्यानंतर एका विशिष्ट समाजात घटना बदलणार असा मेसेज गेला. ही भावना त्यांनी निकाला आधीच बोलून दाखवली होती. शाळेत मनुस्मृतीचे श्लोक येणार म्हणून त्यांनी निषेध नोंदवला होता. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला. त्यावर आंदोलने झाली. फोटो अनावधानाने फाटला होता. या वादात मनुस्मृतीचा मुद्दा मागे राहू नये ही त्यांची भावना होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भुजबळांमुळे नुकसान नाही

मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत. ओबीसी 54 टक्के आहे. त्यांचं संरक्षण करणार आहोत. कोणत्याही जातीधर्माचा टक्का कमी न करता आरक्षण देणार आहोत. भुजबळ ओबीसींचा ते चेहरा आहेत. मोठे नेते आहेत. भुजबळांमुळे लोकसभेला नुकसान झालं असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.