Jalna Constituency : युती धर्माला जालन्यातच वाटाण्याच्या अक्षता; अर्जुन खोतकर विरोधात भाजपा बंड करणार; एक नाही तर दोन उमेदवार निवडणूक रिंगणात?

| Updated on: Oct 23, 2024 | 4:02 PM

Jalna Vidhansabha Constituency : जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात त्याचा ट्रेलर पाहायला मिळत आहे. जालना विधानसभा मतदार संघात भाजपा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अर्जुन खोतकर यांचा विधानसभेत जाणारा रथ भाजपा रोखणार असल्याचे समोर येत आहे.

Jalna Constituency : युती धर्माला जालन्यातच वाटाण्याच्या अक्षता; अर्जुन खोतकर विरोधात भाजपा बंड करणार; एक नाही तर दोन उमेदवार निवडणूक रिंगणात?
युती धर्माचा पडला की विसर
Follow us on

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात भाजपला जोरदार धक्का बसला. रावसाहेब दानवे यांचा मोठा पराभव झाला. सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे होता. पण लोकसभेत अनेकांनी सहकार्य केले नसल्याचे त्यांनी पराभवानंतर सांगितले. त्यांचा रोख अर्थात मित्रपक्षांकडे होता. आता पराभवाचे उट्टे काढण्याची संधी त्यांच्याकडे आपसूकच आली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात या बेदिलीचे पडसाद उमटले आहेत. शिंदे गटाने काल अर्जुन खोतकर यांना उमेदवारी जाहीर करताच भाजप बंडाच्या पवित्र्यात आली आहे. जालना विधानसभा मतदार संघात भाजपा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अर्जुन खोतकर यांचा विधानसभेत जाणारा रथ भाजपा रोखणार असल्याचे समोर येत आहे.

भास्कर दानवे बंडखोरीच्या तयारीत

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना काल शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित झाली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कारण जालना विधानसभा मतदार संघात आपण रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दहा वर्षांपासून भाजपा पक्ष वाढीचे आणि विकासाची कामे केल्याचा दावा भास्कर दानवे यांनी केला आहे. आपण भाजपा कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तसेच भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश राऊत हे ही जालना विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश राऊत हे भाजपचे माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांची जालना शहरासह विधानसभा मतदार संघावर पकड आहे. म्हणजे एकाच मतदारसंघात भाजपचे दोघे खोतकर यांच्याविरोधात लढण्याची तयारी करत आहे.

हे सुद्धा वाचा

आपणंही त्यांचं काम करायचं नाही

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कैलास गोरंटयाल यांनी अर्जुन खोतकर यांचा पराभव केला होता. शिवसेना फुटल्यानंतर खोतकर यांनी शिंदे सेना जवळ केली. पण त्यांचे आणि भाजपचे संबंध कधी जुळले नाहीत. दोघांमध्ये गेली पाच वर्षे धुसफूस दिसून आली. अनेकदा मंचावरून जाहीरपणे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी एकमेकांना चिमटे काढले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खोतकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. त्यांनी जर आपलं काम केलं नाही तर आपण ही त्यांचं काम करायचं नाही, असा सूचक इशारा त्यांनी भाजपला दिला. तर यावेळी गाफील राहून चालणार नाही असं त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षाचं एकमेकांना आव्हान असल्याचे दिसून येत आहे.