‘तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार’, मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना मोठा इशारा

| Updated on: Aug 19, 2024 | 7:17 PM

"फडणवीस साहेब, तुम्ही गोंधळ निर्माण करून ठेवला आहात. वेळ द्या म्हटल्यावर आम्ही वेळ दिला. तुम्ही मात्र पाळला नाहीत. मला निर्णय घेण्याची आत आमची मागणी मान्य करा. 28 ऑगस्ट पर्यंत आमची मागणी मान्य करा. मला हलक्यात घेवू नका", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार, मनोज जरांगे यांचा फडणवीस यांना मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. “फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला कधीही विरोधक मानले नाही. तुम्हीच आमच्यावर खोटे केसेस करून आता तुम्ही पश्चात्ताप करीत आहात. राजीनामा देण्योपेक्षा आम्हाला आरक्षण द्या. हैद्राबाद संस्थानचे गॅझेट अद्याप तुम्हाला भेटले नाही. EWA, ECBC आणि कुणबी तीनही A पर्याय ठेवा. ज्याला जे मिळेल ते मिळेल. आता पश्चात्ताप करू नका. मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. छगन भुजबळ यांचं ऐकलं म्हणून हे सर्व झालं. तुम्ही छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात गेला आहात”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

“तुम्ही मराठ्यांचा रोष घेवू नका. इथे केवळ ओबीसींची बाजू ऐकून घेत आहात. मराठ्यांची बाजू ऐकत नाही. मराठे संपविण्यासाठी तुम्ही का उतावीळ झाला आहात? आम्ही तुमचे विरोधक नाहीत. कोण भुजबळ आणि फिजबळ? त्यांचं आम्ही का ऐकावे? 13 टक्के आरक्षण दिल्यावर तुमचे 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले होते. आम्हाला चिरीमिरी कशाला देता?”, असा सवाल जरांगे यांनी केला.

‘फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे’

“देवेंद्र फडणवीस तुम्हीच छगन भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहेत, असे बोलण्यास सांगितले. माझ्यावर SIT का नेमली? कारण काय? एवढा रोष कशामुळे आहे? पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या, त्याला तुम्ही बढती दिली. मराठ्यांना मारहाण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या जातीचे पोलीस आणले. पोलीस आमच्या बायकांच्या मुंडक्यावर पाय देत होते. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अनेक महिला आमच्या तडीपार केल्यात”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

‘तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका….’

“कोकणातले लोक माझ्याबद्दल का बोलतात? त्याचे काय कारण? कापूस बेंड्या तो कोण आहे? मराठ्यांच्या विरोधात जावून फडणवीस आज तुम्ही पश्चात्ताप करतात. भाजपमधले मराठे आज अस्वस्थ आहेत. तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये बसणार आहे. मराठा, मुस्लिम, दलीत, बारा बलुतेदार, धनगर, बंजारा, आदिवासी सर्व लोक परेशान आहेत. तुम्ही केवळ मतापूर्ते काम करता?”, असा सवाल जरांगेंनी केला.

‘आमच्या पोरांवर अन्याय करू नका’

‘उठ की सुट ईडीची धमकी देत आहेत. त्यामुळे सत्ता येणार नाही. लोक सर्वात शेवटी विचार करतील. फडणवीस यांना सरळ पाडून टाका. माझे आवाहन आहे. मला राजकारणात जायचे नाही. माझी मागणी कुणबी प्रमाणपत्र, आरक्षण आणि केसेस मागे घेण्यासाठी मागणी आहे. आमचे प्रश्न निकाली काढा. छगन भुजबळ यांचे ऐकून आमच्या पोरांवर अन्याय करू नका. विदर्भ, खान्देश, ओबीसी आरक्षणात पूर्ण गेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आरक्षण लागू आहे. ओबीसी यादीत मराठा हा 83 क्रमांकावर येतो. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? इतर समाजाचे व्यवसाय जर सारखे होत असतील तर मराठ्यांचे कसे जमत नाही?”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘मला हलक्यात घेवू नका’

“फडणवीस साहेब, तुम्ही गोंधळ निर्माण करून ठेवला आहात. वेळ द्या म्हटल्यावर आम्ही वेळ दिला. तुम्ही मात्र पाळला नाहीत. मला निर्णय घेण्याची आत आमची मागणी मान्य करा. 28 ऑगस्ट पर्यंत आमची मागणी मान्य करा. मला हलक्यात घेवू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

“तुम्ही पश्चात्ताप झाल्यासारखे खचल्यासारखे बोलत आहात म्हणून मी बोलत आहे. तुम्ही कितीही योजना आणा. रेल्वेने पैसे जरी वाटले तर तुम्ही आता सत्तेत येणार नाहीत. जतीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले. दरेकर तुमच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही. लाड खोड, डाकू माकु. कोण आहेत? हे अन्नाला मोहताज आहेत.13 वर्षापूर्वीची केस माझी शोधून काढली. संभाजीनगर सिडकोमधले तुमचेही प्रकरण मला माहीत आहे. मात्र मी तसे करणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘अन्यथा तुमची राज्यात एकही सीट लागू देणार नाही’

“भुजबळ यांच्या डोक्यावर केस राहिले नाहीत. आमच्या वाट्याला जाऊ नका. मी क्षेत्रात उतरलो तर सीट निवडून येऊच देणार नाही. मी कोणता डाव कुठे टाकेल हे तुम्हाला कळणार नाही. आम्ही 200 वर्ष पूर्वीपासून आरक्षणात आहोत. धनगर बांधवांना आमच्या आंदोलनाच्या विरोधात घालू नका. आरक्षण द्या. अन्यथा तुमची राज्यात एकही सीट लागू देणार नाही”, असादेखील इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

‘आम्ही नाव घेवून पाडणार आहोत’

“फडणवीस यांचा जीव खुर्चीत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला खुर्ची देऊ देणार नाही. काही संकेत मला पाळायचे आहेत म्हणून मी राजकीय बोलणार नाही. किती मराठे माझ्याकडे आले हे मी आताच सांगणार नाही. फडणवीस यांच्या बाबतीत राज्यात खदखद आहे. आम्ही नाव घेवून पाडणार आहोत. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या भाजपच्या नेत्यांनी मी नावे सांगणार नाही. निवडणुकीत विजयी करा, रेकॉर्ड करायचं म्हणतात. ते आमचे काय आजोबा आहेत का? मराठ्यांनी ठेका घेतला नाही. मराठ्यांनी सभा आणि प्रचाराला जाऊ नका. जो कोणी जाईल त्यांनाही निवडणुकीत आपण पाडू. आपली जात आणि पोर मोठे करा. मी कोणीही उमेदवार देईल. त्याला निवडून द्या. राखीव मतदारसंघात मी सांगेल त्याला मराठा समाजाने निवडून द्यावे. आजच मी आवाहन करतो”, असं मनोज जरांगे म्हणाले.