Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, अंतरवाली सराटीत महिलांचा टाहो, उपोषण मागे घेण्यासाठी घातली गळ

| Updated on: Sep 24, 2024 | 2:45 PM

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज पुन्हा एकदा खालावली. गेल्या 16 सप्टेंबरपासून ते उपोषणाला बसले आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. सध्या अंतरवाली सराटीत वातावरण धीरगंभीर झाले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, अंतरवाली सराटीत महिलांचा टाहो, उपोषण मागे घेण्यासाठी घातली गळ
Follow us on

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रात्रीच्यावेळी सलाईन लावण्यात आले होते. आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली. यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा येत होत्या. त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीरगंभीर झाले. महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

उपोषणाचा आज नववा दिवस

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या एक दिवस अगोदर 16 सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष उलटून गेले आहे. सरकारने त्यांना जी आश्वासनं दिली. त्यातील काहींची अंमलबाजवणी झाली नाही. मुंबईच्या वेशीवर सरकारने सगेसोयऱ्याचा अध्यादेश आणि ओबीसीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यात त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांची तब्येत खालावली.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी सोलापूर बंदची हाक

सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, सगेसोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समजाला द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आश्वासन देऊनही शब्द न पाळल्याने जरांगे पाटील यांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे. तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

सभास्थळी धीर गंभीर वातावरण

दरम्यान अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने महिलांसह आबालवृद्ध भावुक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. त्यांनी यावेळी आक्रोश केला. महिलांना अश्रुधारा आवरता आल्या नाही. जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी काही महिला मंचावर आल्या. त्यांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. तर खालून पण मोठ्या संख्येने आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली.