कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीबाबत सतेज पाटील यांनी दोघांशी चर्चा केली. अलमट्टी धरणातून पाणी नियंत्रणात सोडण्याची विनंती यावेळी त्यांनी केली आहे. डी के शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची सतेज पाटील यांनी माहिती दिलीय. अलमट्टी धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडल्याने त्या पाण्याचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा फटका बसतोय.
कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. दुपारपर्यंत स्थिर असलेली पाणी पातळी पुन्हा एक इंचाने वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट चार इंचांवर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात दिवसभर पावसाचा जोर ओसरला तर धरण क्षेत्रातही अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सध्या अडीच लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाचा मुद्दा लोकसभा अधिवेशनात मांडला गेला. पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागात होणाऱ्या मुसळधार पाऊसाचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला. पुण्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाकडून पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही.एनडीआरएफच्या माध्यमातून बाधित क्षेत्रात केंद्र सरकारने मदत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली आहे.
इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त समितीने गांधी चौकात रस्ता रोको केला. कर्नाटक राज्यातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग जास्त करावा, यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला आहे. अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून पाणी सोडत नसल्यामुळे याचा फटका कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी फटका बसत असतो. या भागातील महिलांनी केला कर्नाटक सरकारचा निषेध केला.
काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत प्रतिक्रिया दिली. पश्चिम महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीचं पात्र लहान आहे. 2019 ला मोठ्या पुराचा फटाका बसला होता. कोयना धरणातून विसर्ग कायम सुरू आहे. सांगलीत धोक्याची पातळी निर्माण झाली आहे. विशाल पाटील आणि मी सांगलीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याबाबत मी कालच डी के शिवकुमार यांच्याशी बोललो आहे. पाऊस मोठा पडतोय, कोयनेचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टीचा विसर्ग सुरू आहे. राज्य सरकारने सतर्क यंत्रणा ठेवावी, अशी आमची मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे ग्रामीण जनतेला मोठा फटका बसतोय. राज्य सरकारने तात्पुरती योजना न करता कायमस्वरूपी योजना कराव्यात, असं विश्वजित कदम म्हणाले.