Ganpati Special Trains : गणपती सणाच्या गाड्यांचे आरक्षण लागलीच झाले फुल, चाकरमान्यांना आणखी गाड्यांची प्रतिक्षा

| Updated on: Aug 21, 2024 | 5:20 PM

रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल झाल्याने आता चाकरमान्यांना खासगी बसेसचा दर कसा परवडणार? असा सवाल चाकरमान्यांकडून केला जात आहे.

Ganpati Special Trains : गणपती सणाच्या गाड्यांचे आरक्षण लागलीच झाले फुल, चाकरमान्यांना आणखी गाड्यांची प्रतिक्षा
Konkan Railway
Follow us on

कोकणातील गणपती उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी दरवर्षी हटकून जातातच. यंदाही मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर 202 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. तर पश्चिम रेल्वेने देखील सहा गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. या 206 गाड्याचे बुकींग अनुक्रमे 21 आणि 28 जुलै रोजी सकाळीच फुल झाले आहे. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे 5 आणि 6 सप्टेंबरच्या तिकीटांना सर्वात आधी मागणी असते. कारण कोकणात सणाच्या दोन दिवस आधी जाऊन घराची साफसफाई करायची असते. परंतू या तारखांच्या तिकिटांचे बुकिंग सुरु होताच सकाळी आठ वाजून अवघ्या काही मिनिटांत संपले आहे. चाकरमान्यांच्या हाती 700 ते 800 ची वेटिंगची तिकीटे हाती आली आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने आणखी गाड्या सोडाव्यात अशी मागणी चाकरमान्यांनी केली आहे.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गणपती स्पेशल गाड्यांचे अवघ्या काही मिनिटातच बुकिंग फूल झाल्याची माहिती समोर आली आहे.अवघ्या पाच मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल झाले असून वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात गेली आहे. गणपती काळात चाकरमान्यांकडून गणपती स्पेशल ट्रेनची मोठी मागणी होत असते. त्यामुळे गणेशोत्सव काळात मध्य रेल्वे यंदा202 विशेष गाड्या चालवणार आहे तर पश्चिम रेल्वे कडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. अशा एकूण 258 गाड्या 1 ते 18 सप्टेंबर या तारखांदरम्यान चालविण्यात येत आहेत. गणशे चतुर्थींच्या दोन दिवस आधीच्या गाड्यांनाच जास्त मागणी असते. त्यामुळे या तारख्याच्या गाड्या आधीच फूल झाल्याने आता चाकरमान्यांना आणखी जादा गाड्यांची प्रतिक्षा आहे.

जादा वेटिंगचे तिकीटे न देण्याचे आवाहन

गणपती स्पेशल गाड्या पनवेल टर्मिनस येथून सोडता त्या सीएसएमटी किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडाव्यात अशी मागणी चाकरमान्यांनी केली आहे. तसेच यंदा तिकीट खिडक्यांवरुन काढलेल्या वेटिंग तिकीटावर प्रवास करु न देण्याचा नियम घातला असल्याने रेल्वेने अशी भलीमोठी वेटिंग लीस्टची तिकीटे जारीच करु नयेत अशी मागणी चाकरमान्यांनी केली आहे. गणपतीसाठी बुक केलेली तिकीटे फारसे कोणी आयत्यावेळी रद्द करीत नाहीत. त्यामुळे जादा वेटिंगची तिकीटे देऊ नयेत अशी विनंती चाकरमान्यांनी केली आहे.

खाजगी ट्रव्हल्सकडून लूट

प्रवाशांची वाढती मागणी बघता मध्य रेल्वे आणखी 50 गाड्या सोडण्याची शक्यता आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम अजूनही धड पूर्ण झालेले नाही. त्यातच खाजगी बसचालकांकडून गणपती काळात दोन ते अडीच हजार रुपयांचा दर लावला जात असल्याने प्रवाशांची चांगलीच लूटमार होत असते. आरटीओ दरवर्षी प्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याचे रडगाणे सांगत अशा बसचालक आणि मालकांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे आरटीओ विभागाने देखील कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.