EC Press Conference on Assembly Election 2024 : पेजर हॅक होतो, ईव्हीएम का नाही?, निवडणूक आयुक्त काय म्हणाले?; ईव्हीएमच्या सुरक्षेची दिली मोठी माहिती

| Updated on: Oct 15, 2024 | 5:03 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेबद्दल घोषणा केली. महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

EC Press Conference on Assembly Election 2024 : पेजर हॅक होतो, ईव्हीएम का नाही?, निवडणूक आयुक्त काय म्हणाले?; ईव्हीएमच्या सुरक्षेची दिली मोठी माहिती
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकांच्या तारखांची चर्चा सुरू होती. अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठी मतदानाची तारीख आणि मतमोजणी कधी असेल या दोन्ही तारखांची अधिकृत घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेबद्दल घोषणा केली. महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरआधी नवं सरकार बनणार आहे. त्यापूर्वीच मतदान होऊन निकाल लागेल असं स्पष्ट करण्यात आलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या , मविआ सरकार, नंतर शिंदेचे सरकारमधून बाहेर पडणं, महायुती सरकार, अजित पवारांनी घेतलेली राजकीय भूमिका या सर्व घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे काय, जनतेचा कौल यंदा कुणाला, हे जाणून घेण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत निवडणुकांबाबत माहिती दिल्यानंतर अनेक पत्रकारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारले. ईव्हीएम हॅक होण्यावरून किंवा ईव्हीएमच्या मुद्यावरून अनेकदा तक्रारी आल्या आहेत. हरियाणात झालेल्या निवडणुकीदरम्यानही विरोधकांनी ईव्हीएमवरून, बॅटरीच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल, त्यांना काय सांगाल ? असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं.

पेजर हॅक होतो, ईव्हीएम का नाही?

या प्रश्नावर राजीव कुमार यांनी स्पष्ट उत्तर दिलं.’ अनेकदा मी त्यावर सांगितलं. थोडा वेळ लागेल तरी सांगतो. पेजरने उडवू शकतो, ईव्हीएमने का होऊ शकत नाही असा प्रश्नही अनेक वेळा विचारला जातो. पेजर कनेक्टेड असतो, पण ईव्हीएम कनेक्टेड नसतं. पाच सहा महिन्यापूर्वी ईव्हीएमची एफएलसी ( first level checking of EVM) होते. आमच्याकडे कुणी विचारणा केली तर आम्ही लिखित उत्तर देऊ आणि ते पब्लिशही करू. आम्ही ईव्हीएमची सर्व चेकिंग करत असतो. स्टोरेजपासून बुथपर्यंत प्रत्येकवेळी राजकीय पक्षाचे एजंट असतात. मशीनमध्ये कमिशनिंग करताना त्यात बॅटरी टाकली जाते. ईव्हीएमवर संशय घेतलेच जाणार आहेत’ असे ते म्हणाले.

‘ मतदानाच्या पाच किंवा सहा दिवसांपूर्वी कमिशनिंग होते. त्या दिवशी त्यात निशाणी टाकली जाते. त्यावेळी नवीन बॅटरी टाकली जाते. बॅटरीवरही एजंटच्या सह्या असतात. कमिशनिंगच्या नंतर त्यांच्यासमोर स्ट्राँग रुममध्ये ठेवलं जातं. तीन लेअरची सेक्युरिटी असती. त्यावर डबल लॉक होतं. मोठी सेक्युरिटी होती. त्याचे व्हिडीओग्राफ होतं. उमेदवाराचे एजंट असतात. बुथवर आणल्यावरही एजंट समोरच मशीन उघडली जाते. सही दाखवली जाते. मशीनचा नंबर दाखवला जातो’ असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही सर्व माहिती देणार आहोत

ईव्हीएम फुल्ल झाल्यावर त्याचा सिग्नल दिला जातो. त्यामुळे मशीन फुल्ल झाल्याचं कळतं. आम्ही याची सर्व माहिती देणार आहोत. सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आम्हाला जे सवाल केले, त्याचे उत्तर आम्ही देणार आहे. आम्ही आरओला डिटेल्स देण्यास सांगितलं आहे. उमेदवारांना उत्तर दिल्यानंतर आम्ही त्याची माहिती सार्वजनिक करणार आहोत, असे राजीव कुमार यांनी सांगितलं.