“वसंत देशमुख यांनी जे वक्तव्य जयश्री थोरात यांच्याबाबत केलं, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. राजकारणात कोणीही संयम सोडता कामा नये व्यक्तिगत टीका करता कामा नये, ही आमची संस्कृती नव्हे, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सुजय विखे पाटील यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. कोणीही या आडून आपलं राजकारण साधू नये” असं प्रविण दरेकर म्हणाले.
“मी जिंकण्यासाठी उभा राहिलेलो आहे. माझे कार्यकर्ते फार मेहनत घेत आहेत. नितेश राणेंना सक्षम पर्याय महाविकास आघाडीने दिलाय. एकदा जनतेचा उद्रेक झाल्यानंतर भले-भले या लोकशाहीत पराभूत झाले आहेत. नारायण राणेंना अहंकार झालेला होता, त्यांचा देखील पराभव झालेला आहे” अशी टीका संदेश पारकर यांनी केली.
“नाना पटोले यांनी sc st यांची माफी मागावी. त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक व्हावं. आरक्षण काढून टाकू असं अमेरिकेत जाऊन राहुल गांधी बोलले, त्याचं दोन पाऊल पुढे जाऊन समर्थन पटोले यांनी केलं. आरक्षण काँग्रेसने नाही तर संविधानातून मिळालं आहे. समान संधी म्हणजे आरक्षण होय. नाना पटोले यांच्या विधानातून आरक्षण नको असा अर्थ निघतो. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी” असं आशिष शेलार म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून शिंदे गटाचे सदा सरवणकरही निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, आशिष शेलार यांनी या मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. महायुतीपुढे आपण हा प्रस्ताव ठेवणार असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
अखेर महाविकास आघाडीचा जागांचा तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाचे पक्ष प्रत्येकी 90 जागा लढणार आहेत. या नेत्यांनी 90-90-90 चा फॉर्म्युला ठरवला आहे. तर मित्र पक्षांसाठी 18 जागा सोडण्यात आल्या आहेत.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्येच चर्चा होणार आहे. विदर्भातील काही जागांचा तिढा बाकी आहे. या जागांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला हिंगोलीची जागा सुटली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर नाराज झाले असून त्यांनी समर्थकांशी तातडीची बैठक बोलावली आहे. भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने गोरेगावकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवी राजा बंडाच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. रवी राजा यांनी सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या ऐवजी काँग्रेसने आज गणेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रवी राजा हे नाराज झाले असून उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. रवी राजा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पाच टर्म ते नगरसेवक आहेत.
अजितदादा गटाने हायटेक प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. अजितदादा गटाची एलईडी व्हॅन राष्ट्रवादी उमेदवारांच्या मतदारसंघात जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या व्हॅनचं आज उद्घाटन केलं. व्हॅनच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या महायुतीच्या लोककल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजनेमार्फत अडीच कोटी महिलांना दिलेला लाभ, शेतीपंपाची वीज माफी, मुलींच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलण्याचा क्रांतिकारी निर्णय अशा अनेक योजना या मार्फत जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून मिलिंद देवरा लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेची ही परंपरागत सीट आहे. पण या जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत तिढा वाढला आहे. वरळीतून लढण्यासाठी इच्छूक असलेले भाजपचे नेते संतोष पांडे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे वरळीचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुतीत मुंबईतील काही जागांचा तिढा अद्यापही सुटता सुटताना दिसत नाहीये. वर्सोवा, अंधेरी पूर्व, शिवडी, वरळी, कलिना आणि चेंबूरची जागाही एकनाथ शिंदे गटाला हवी आहे. युतीत या जागा शिवसेनेकडेच होत्या. ज्या जागावर शिवसेनेकडे उमेदवार नाही त्या जागेवर उमेदवार आयात करून जागा लढण्याची शिवसेनेची तयारी आहे. तर दुसरीकडे भाजपला हवीय शिवडी, वर्सोवा आणि चेंबूरची जागा हवी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचा दावा असलेल्या जागांचा पेच आज तरी सुटणार का हे पाहण महत्वाचं ठरेल.
गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. महाविकास आघाडी मध्ये शिरोळ ची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते
बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर कधीही येऊ शकतात आम्हीपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. मी सुद्धा शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे बसून चर्चा केली .288 जागेवरती प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्र मोठे राज्य आहे इतर राज्य प्रमाणे नाही तीन पक्ष प्रमुख आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
मला माझ्या कार्यकर्त्यांचा जीव महत्वाच आहे. त्यांचे भविष्य महत्वाचे , मी काल एक फोन केला असता तर चार पट माणसे आली असतील. मुद्दयावर बोला , नाही तर मी अधिकृतपणे सांगतो सहन करणार नाही. गणेशच्या विजयी मिरवणुकीत काय काय बोलले. 23 तारखेला मतपेटी बाहेर येताच कळेल एक लाखांच मताधिक्य आपणास मिळेल. मी ते भाषण थांबवल असत मात्र ती घटना अचानक घडली. जयश्री मला बहिणीसारखीच आहे. कोणी कार्यकर्त्यांनी देखील बोलू नये, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने त्यांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ज्यांना स्थान मिळाले नव्हते, त्यातील काही जणांचा दुसर्या यादीत समावेश आहे. अशी आहे यादी…
भाजप कार्यकर्ते आणि विखे पाटील समर्थकांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ लोणी येथे विखे समर्थकांकडून निषेध सभा घेण्यात येत आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले आहेत.सुजय विखे पाटील , त्यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील यांचीही निषेध सभेस उपस्थिती आहे.
कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये 15 लाख रुपये सापडले. तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना रक्कम सापडली. ही बोलेरो कार गुजरात पासिंगची असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. पण महायुतीचं गाडी मुंबईवर येऊन अडकली आहे. मुंबईतील काही जागांवर अजूनही एकमत झाले नसल्याचे चित्र आहे.
माझी गाडी जाळणार अशी मला आधीच माहिती मिळाली… माझ्या मार्गावर जमाव येणार अशी माहिती मला मिळाली… आमच्या लोकांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली… कालचा राडा आधीच ठरवून झाला होता… असं वक्तव्य देखील सुजय विखे यांनी केलं आहे.
नाना पटोलेंसोबत माझा चांगला संवाद सुरू… मविआत उत्तम समन्वय, 90 – 90 – 90 जागांचा फॉर्म्युला… 175 जागा जिंकून मविआ सरकार बनवेल… नांदेड उत्तर, हिंगोलीच्या जागेबाबत पटोलेंशी चर्चा… संजय राऊत यांचं वक्तव्य
अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल चोपडे यांनी आपला प्राथमिक अर्ज दाखल केला… राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा दिला राजीनामा आणि अपक्ष उमेदवार म्हणून लढणार विठ्ठल चोपडे… 28 तारखेला आपला अपक्ष उमेदवारी अर्ज विठ्ठल चोपडे करणार दाखल… महायुतीला मोठा धक्का आणि अजित पवार गटालाही मोठा धक्का
कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारमध्ये सापडले 15 लाख… तासवडे टोल नाक्यावर कारची तपासणी करत असताना सापडली रक्कम… बलेरो कार गुजरात पासिंगची… पैसे नेमके कशाचे याचा तपास सुरु…
तिरुपती कोंडेकर आहेत नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार… भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आहेत भाजपाकडून उमेदवार…
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रदीप कंद रिंगणात? शिरूर हवेलीत महायुतीत बंडखोरीची शक्यता आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते प्रदीप कंद अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा पारंपारिक मतदार संघ असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार निर्णय आहे, असं प्रदीप कंद म्हणालेत. लोकसभेला ही प्रदीप कंद यांना इच्छुक आहेत. पण उमेदवारी न मिळाल्याने काहीही झालं तरी आता लढायचं असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार का? याकडे लक्ष आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं आहे. सोलापूर दक्षिणची जागा शिवसेनेचीच असून शिवसनेनेचे अमर पाटीलच निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस नेते दिलीप मानेंच्या दबावानंतर शिवसेना उपनेते शरद कोळी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय मात्र दक्षिण सोलापूरची जागा शिवसेना लढणार आहेत. काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी कृत्य करू नये. येत्या सोमवारी महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं शरद कोळी म्हणालेत.
तिरुपती कदम कोडेंकर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले आहेत. तिरुपती कोंडेकर आहेत नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आहेत भाजपकडून उमेदवार आहेत.
रावेरमध्ये सध्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढत होत आहे. भाजपाचे अमोल जावळे विरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी अशी लढत होत आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे माजी खासदार माजी आमदार यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आले आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी येथे रिंगणात आहे.
स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. संभाजीराजे पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत. संभाजीराजे छत्रपती संभाजीनगरहुन अंतरवाली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. संभाजीराजे तिसऱ्या आघाडी महाशक्तीचे प्रमुख नेते आहेत.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात विविध घडामोडी घडत आहेत. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. यावरून राजकारण तापलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी आली आहे. याचसोबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. याबाबतचे सर्व महत्त्वाच्या घडामोडी, तसंच मनोरंजन, क्रीडा विश्वातील घडामोडींचेही अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा ब्लॉग फॉलो करा.