वरळीतून आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरू; महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ; वरळीत काय घडणार?

| Updated on: Oct 25, 2024 | 11:50 AM

शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. वरळीच्या विकासाबाबत त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे. स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे कुठून निवडणूक लढवणार आहेत की प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार, असेही त्या म्हणाल्या.

वरळीतून आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरू; महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ; वरळीत काय घडणार?
आदित्य ठाकरे
Follow us on

Sheetal Mhatre On Aditya Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेले अनेक दिग्गज अर्ज भरताना दिसत आहेत. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आता शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. वरळीला विकासापासून वंचित ठेवलेल्या आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची नुकतंच बाळासाहेब भवन या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर खरमरीत टीका केली. तसेच वरळीमुळे आदित्यचा विकास झाला असा टोलाही शीतल म्हात्रे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे कुठून निवडणूक लढवणार

“लोकसभा निवडणुकीत आव्हान देणारे आज उंदरासारखे वरळीच्या बिळात जाऊन लपले. लोकसभेत फेक नरेटिव्हच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांची मते मिळवली. मात्र उबाठाने पहिल्या यादीत किती अल्पसंख्यांकांना उमेदवारी दिली ते पाहायला हवे. निवडणुकीत वापरा आणि फेकून द्या असे उबाठाचे धोरण आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला उबाठाने नाशिकमधून उमेदवारी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरणार आहेत. मात्र उबाठा गटात आदित्य ठाकरेंनी पहिला अर्ज भरला. स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे हे कुठून निवडणूक लढवणार आहेत की प्रत्येकवेळी मागच्या दाराने येणार”, असे शीतल म्हात्रे यांनी म्हटले.

“महाविकास आघाडीने उबाठाला खरी जागा दाखवली”

“लोकांच्या मनामधला मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांच्या मध्ये उतरावे लागते. लोकांशी फेस टू फेस बोलावे लागते. फेसबुक लाईव्ह करुन कोणी मुख्यमंत्री होत नाही. एक दिवस जनताच तुमच्या तोंडाला फेस आणेल. उबाठाने १४६ जागांसाठी भाजपबरोबर युती तोडली आज त्यांना 85 जागा मिळत आहेत. १९९५ मध्ये शिवसेनेला १६९ जागा, १९९९ मध्ये १६१ जागा, २००४ मध्ये १६३ जागा, २००९ मध्ये १६० जागा आणि २०१४ युती तोडल्याने शिवसेना २८६ जागांवर निवडणूक लढली होती. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या. आता केवळ ८५ जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीने उबाठाला खरी जागा दाखवली”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.

शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही

“८५, ८५ आणि ८५ म्हणजे २७० असे नवे गणित राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल सांगितले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसचा गेम झाला. सगळ्यात जास्त आमदार असूनही त्यांना केवळ ८५ जागा मिळाल्या. दोन मांजरांच्या भांडणात बोका लोण्याचा गोळा मटकावतो. हा बोका कोण आहे हे सगळ्यांना माहित आहेत, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. लोकसभेत शिवसेनेत ज्यांना तिकिट मिळाली नाहीत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर मानाची पदं देतील. शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही”, असा विश्वासही शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केला.