“…तर आमचं सरकार सत्तेत आलं नसतं”; महायुतीतील बड्या मंत्र्यांचे विधान

| Updated on: Mar 02, 2025 | 4:33 PM

महाराष्ट्रातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विजयाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या मते, या योजनेमुळे महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि सरकार सत्तेत आले.

...तर आमचं सरकार सत्तेत आलं नसतं; महायुतीतील बड्या मंत्र्यांचे विधान
devendra fadnavis
Follow us on

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा करण्यात आले. जर आमची सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ, असेही सांगण्यात आले. या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता या योजनेवरुन एका महायुतीतील मंत्र्याने मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजना आली नसती तर आमचे सरकार सत्तेत आले नसते, असे विधान महायुतीतील मंत्र्याने केले आहे.

पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं, पण आम्ही भगव्यासोबत निष्ठा राखली. लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. आमचे सरकार सत्तेत आले नसतं, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तर भगव्यासोबत निष्ठा राखली

आम्ही तत्त्वांची कधी फारकत घेतली नाही. ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे ते आपल्याला माहिती आहे, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आपण हिंदू आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. या निवडणुकीत लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. हे शिवसेनाप्रमुख यांच्या तालमीतले कार्यकर्ते नाहीत. यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. पण आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली नाही. तर भगव्यासोबत निष्ठा राखली आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“त्या दिवशी आम्ही ठरवलं की उठाव करायचा आहे…”

“एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. आमचे सरकार सत्तेत आले नसते, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. रक्ताचं पाणी करून आम्ही शिवसेना वाढवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगायचे त्या आदेशाचे आम्ही पालन करायचा. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे ज्या दिवशी काँग्रेसची युती केली त्या दिवशी मी आपलं दुकान बंद करेल. ज्या दिवशी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची युती केली. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की आम्हाला उठाव करायचा आहे. त्यावेळी आम्ही सुरत गुवाहाटीमार्गे उठाव केला. अडीच वर्ष महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी दमदार काम केल्यामुळे महायुतीच्या 277 जागा विजयी झाल्यात”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजना आली नसती तर…

“जिल्ह्यात विरोधकांचा एकही आमदार लोणचं घालण्यासाठी शिल्लक राहिला नाही. आम्ही शोपीस आमदार नाही. जनतेसाठी कधीही आमचे दरवाजे खुले असतात. मी सहज मंत्री झालो नाही. मी निवडून येईल का नाही, याचीही मला शाश्वती नव्हती. आमच्या शिवसेना प्रमुखांचं म्हणणं हेच होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी, महाराष्ट्राच्या बाहेर आपण हिंदू म्हणून काम करू. आपण हिंदू आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. हिंदूस्थानामध्ये राहतो तो हिंदू महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी. या भरोवसावर शिवसेना वाढली. त्याच माध्यमातून एकनाथराव शिंदे काम करत आहे. लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती व आमच्या सरकार सत्तेत आले नसतं”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.