आज सकाळपासूनच कडाक्याचं ऊन होतं. चौथ्या टप्प्यातील मतदानही पार पडलं. या मतदान प्रक्रियेवरही उन्हाचा परिणाम झाल्याचं बोलण्यात येतंय. सकाळपासूनच नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. अशात दुपारनंतर मात्र वातावरण बदललं अन् महाराष्ट्रभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मोसमातील पहिला पाऊस असल्याने लोकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं खरं… पण याच अवकाळी पावसाने मात्र मोठं नुकसान केलं आहे. मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. एका जागेवर होर्डिंग कोसळलं. तर कुठे झाड कोसळल्याचं समोर आलंय.
उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच अचानकपणे पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा जरी मिळाला असला तरी या पावसाने नुकसानही केलं आहे. अचानक आलेला अवकाळी पावसाचा फटका हार्बर रेल्वे मार्गावर देखील झाला आहे. लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय.
जोगेश्वरीत नारळाचं झाड कोसळलं. मेघवाडी नाका इथं नारळाचं झाड कोसळलं आहे. वादळी वाऱ्यामुळे नारळाचं झाड कोसळलं आहे. घाटकोपरच्या छेडा नगरजवळ मोठं होर्डींग पेट्रोल पंपावर कोसळलं. जवळपास शंभर जण अडकल्याची शक्यता आहे. 35 जखमीना राजावाडी रूग्णालयात करण्यात दाखल आलं आहे. अग्निशामक दल, पोलीस प्रशासन आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दुपारी 4.30 दरम्यान घटना घडल्याची माहिती आहे.
एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठमोठे होर्डिंग्ज लावले जातात. हे होर्डिंग्ज उंच असतात. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांपर्यंत आपलं उत्पादन पोहोचण्यासाठी होर्डिंग्ज वापरले जातात. आता निवडणूक काळात प्रचारासाठीही होर्डिंगचा वापर केला जातो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाचा फटका बसला आहे. वाळूज आणि दौलताबाद परिसरात अवकाळी पाऊस पडला. साडेपाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.
रत्नागिरीतील लांज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण , गुहागर पाठोपाठ आता लांज्यात पावसान हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. उकाड्याने हैरान झालेल्या रत्नागिरीकरांना काहीसा गारवा मिळालाय.
सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. कोरेगाव शहरातही आज अवकाळी पावसामुळे कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक वडाचे झाड पडलं. त्यामुळे साताऱ्याहून कोरेगावकडे आणि कोरेगावहून साताराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांची भली मोठी रांग या रस्त्यावर लागलेली पाहायला मिळालं. तब्बल दोन तासाहून अधिक या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र फळबाग शेतीला याच्या मोठा फटका बसणार आहे. तसेच मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीवर देखील याच्या परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.