Maharashtra Vidhansabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. यामुळे सध्या सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या महायुतीत आणि महाविकासआघाडीत जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहेत. त्यातच आता शरद पवारांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाबद्दलही भाष्य केले.
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन सातत्याने चर्चा सुरु आहेत. महाविकासाआघाडीतील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मात्र आता महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
राज्यात महाविकासाआघाडीचं सरकार आणणं हे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा जागा अदलाबदली होऊ शकते. तसेच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आमदार निवडून आल्यानंतर घेऊ. त्यासोबतच जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात, तेवढ्या जागा प्रत्येक पक्षाला दिल्या जातील, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
आम्ही जसं सरकार आणण्याची काळजी घेतोय, तसं सत्ताधारीही घेत आहे. तसेच येत्या विधानसभेला आमचं तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्हं राहिल, असे शरद पवारांनी म्हटले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीनतंर महाविकासाआघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच एका सर्व्हेत येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. जर निवडणुका झाल्या तर काँग्रेसला 80 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं बोललं जात आहे.
लोकसभेत पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढली होती. यातील ८ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे बोललं जात आहे. शरद पवार येत्या विधानसभेला नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पवार गटाचे ५० हून अधिक आमदार जिंकून येऊन शकतात, असे बोललं जात आहे. तर ठाकरे गटाला साधारण 30 ते 35 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.