“सरकारला आणखी एक संधी देतोय नंतर…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, पुन्हा उपोषण करणार

| Updated on: Sep 16, 2024 | 2:51 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत.

सरकारला आणखी एक संधी देतोय नंतर..., मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, पुन्हा उपोषण करणार
Image Credit source: social media
Follow us on

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा आंदोलन, उपोषण करताना दिसतात. मराठा समाजातूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली.

“आम्ही स्थगित केलेलं आमरण उपोषण आजपासून पुन्हा सुरु करत आहोत. आज मध्यरात्रीपासून आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहोत. आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक करु नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय, नंतर आमच्या नावाने तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आजपासून आमरण उपोषण सुरु करत आहे. तसेच या उपोषणाच्या माध्यमातून आणखी एक संधी सरकारला देत आहे. नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मला राजकारणाकडे जायचं नाही”

“मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गाझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

“राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही”

“आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही, आमची अंमलबजावणी करा, नंतर बोंबलू नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपमधील काही माकडे आहेत त्यांना सांगा की मनोज जरांगे फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

धनगर बांधवांना विनंती आहे की उगाच भांडण विकत घेऊ नका. छगन भुजबळांचे एकूण भांडण करू नका. छगन भुजबळ बुद्धीभेद करून दंगली घडवणार आहेत. जालन्याच्या SP आणि गृहमंत्र्यांना सांगतो, आमच्या एकाही माणसाला खरचटले नाही पाहिजे. तू इथे दंगल घडवू नको, तुमची (धनगर) आमची नाराजी नाही. मराठ्यांनी जर तुमच्या ST आरक्षणाला विरोध केला, तर मग विरोध करा, तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. एकाही धनगर आणि ओबीसी नेत्यांना मी दोष दिलानाही फक्त भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून भुजबळ तसे करतात, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.