Manoj Jarange Patil Withdrawal Fast Agitation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक पावित्रा घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. गावातील ज्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला, त्यांच्या हस्ते हे उपोषण सोडणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. यानंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस प्राशन करत उपोषण सोडले. यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेवेळी जरांगे पाटील यांनी माझ्या शरीराला धोका झाल्याचा मोठा दावा केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उषोषण सोडल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सलाईन घेऊन उपोषण करण्यापेक्षा ते न केलेलं चांगलं. माझ्या उपोषणामुळे समाजाला न्याय मिळेल, हा माझा उद्देश होता. या उपोषणामुळे गरीब मुलांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी वेळ वाढवून मिळाला. आता मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिली आहे. तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. मला सलाईन लावून उपोषण करायला आवडत नाही. त्यापेक्षा ते सोडलंल बरं म्हणून मी उपोषण स्थगित केले.”
“माझे उपोषण व्यवस्थित सुरु होते. मात्र काल रात्री माझी तब्येत बिघडली. माझी शुगर कमी झाली. त्यावेळी डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मला शरीराला धोका आहे, असे सांगितले. त्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली. मी त्यांचे ऐकत नसल्याने मला 20, 30 जणांनी दाबले आणि जबरदस्ती सलाईन लावले.
यावेळी कार्यकर्त्यांसह समाजाचे असं म्हणणं होतं की, आपल्याला आरक्षण उशिरा भेटेल, पण आम्हाला तुम्ही पाहिजेत. तुम्ही आम्हाला पाडायचे सांगा, तुम्ही सांगितले तर आम्ही बापाला पाडतो. मग ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा इतर कोणीही असतो”, असे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करत होते. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत खालवली. त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. यानंतर त्यांनी हे उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. उपोषण संपल्यानंतर आता पुन्हा एकदा ते राज्यात दौरा सुरु करणार आहे. ही घरी बसायची वेळ नाही. येत्या 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा राज्यात दौरा करणार असे जरांगे पाटील यांनी म्हटले.