‘लाडकी सून’ योजना सुरू करा, थेट मंत्र्याच्या बायकोचीच सरकारला मागणी; सरकार ऐकणार?

| Updated on: Jul 27, 2024 | 3:18 PM

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला महिला वर्गाने डोक्यावर घेतलं आहे. योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यावरून या योजनेची महती लक्षात येते. दरम्यान, ही योजना आल्यानंतर आता याच धर्तीवरच्या वेगवेगळ्या योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे.

लाडकी सून योजना सुरू करा, थेट मंत्र्याच्या बायकोचीच सरकारला मागणी; सरकार ऐकणार?
Follow us on

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्य सरकारने राज्यात योजनांचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ योजनाही सरकारने आणली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. ज्या महिला गरीब आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी तहसील कार्यालयावर होताना दिसत आहे. या योजनेचा प्रतिसाद पाहून आता वेगवेगळ्या योजनांची मागणी होऊ लागली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण पाटील यांनी थेट लाडकी सून योजना लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरकार ही मागणी मान्य करतं का? मंत्र्याच्या बायकोचं सरकार ऐकतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारने ‘लाडकी सून’ योजना सुरू करावी. अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी केली. ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल. असं म्हणत या योजनेला राज्यातीलचं नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची संमती राहील, असा विश्वास किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मंचरमध्ये सरकारने लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सूनेचं दु:ख कुणाला कळत नाही?

सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली, तशीच आता ‘लाडकी सून’ योजना आणावी. अशी योजना आली तर जगातील सर्वच महिला या योजनेचं स्वागत करतील. कारण प्रत्येक मुलगी हे कधी न कधी सून होतेच अन् त्याचं सूनेचं दुःख कोणाला कळतचं नाही? अशी खंत व्यक्त करत ‘लाडकी सून’ योजना आली तर आपलं नशीब उजळेल, असंही किरण वळसेंनी आवर्जून नमूद केलं.

आमची वाट्टेल तेवढी बदनामी झाली

या सरकारच्या काळात आमची वाट्टेल तितकी बदनामी झाली, असंही किरण वळसेंनी बोलून दाखवलं. मुळात मला राजकारणात अजिबात रस नाही. मी फक्त निवडणुकांपुरता प्रचार करते, मात्र त्यातही कोणत्या पक्षाचा अथवा नेत्यांचा उल्लेख मतदारांसमोर करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.