महाराष्ट्राची सर्कस झालीय, बुजुर्ग म्हणावं तेच … राज ठाकरे यांचा शरद पवार यांना टोला

| Updated on: Oct 07, 2024 | 12:26 PM

साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजे. आम्ही काय करायचं असतं हे तुम्ही सांगितलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची सर्कस झालीय, बुजुर्ग म्हणावं तेच ... राज ठाकरे यांचा शरद पवार यांना टोला
महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us on

महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राजकारण्यांची भाषा खाली गेली आहे, खालच्या थराला जाऊन लोक बोलत आहेत, त्यांना समजावणारं कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागले आहेत,अशा शब्दांत महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजेत, असे आवाहन ठाकरे यांनी केलं. मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या आठवडयात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन केलं . त्यावर राज ठाकरेंनी ट्विटर करत खोचक टीका केली होती. आजा पुण्यात बोलताना त्यांनी पुन्हा हाच मुद्दा निदर्शनास आणून देताना टीकास्त्र सोडलं. सध्या राजकारणाची जी स्थिती झाली आहे, त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. राजकारणाचा ढासळता स्तर, राजकारण्यांनी वापरलेली भाषा, खालच्या थराला जाऊन बोलणं, बुजूर्ग नेत्यांनीही मुलाहिजा न राखता शब्द वापरण या सर्वांवर राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत निशाणा साधला.

राज्याची सर्कस झाली आहे

महाराष्ट्राचा झालेला खेळ, राज्याची सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे. राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात. तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतो, असं राज ठाकरे साहित्यिकांना म्हणाले.

माझं बोलून झालं, विषय संपला

आम्ही काहीही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी जे बोलतो, भाषण करतो, त्यावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया येतात ते मी वाचत नाही. त्या भानगडीत मी पडत नाही. माझं बोलून झालं, विषय संपला, कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देत नाही. अब्राहम लिंकन यांचं एक छान वाक्य माझ्या वाचनात आलं. ते म्हणाले होते, जे लोकं तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही. जे तुमचा द्वेष करतात ते स्पष्टीकरण ऐकत नाही. मग कशाला देता स्पष्टीकरण ? असं ठाकरे म्हणाले.

साहित्यिकांनी भूमिका घ्यावी

म्हणून साहित्यिकांनी भूमिका घ्यावी. राजकारण्यांची भाषा खाली गेली आहे, खालच्या थराला जाऊन लोक बोलत आहेत, त्यांना समजावणारं कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आहारी लागले आहेत. यावरून अजून काय बोलायचं ? ही जबाबदारी साहित्यिकांनी घेणं गरजेचं आहे. संमेलन होत राहील, पुस्तकं येत राहतील. पण साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. राजकारणात जी भाषा वापरली जात आहे, भविष्यात जी मुलं राजकारणात येणार आहे, त्यांना वाटतं हेच राजकारण. ही भाषा म्हणजे राजकारण. राज्याचं अध:पतन होण्याचं कारण म्हणजे चॅनल मीडिया. हे लोक जेव्हा दाखवायचं बंद करतील तेव्हा हे बंद होईल. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजे. आम्ही काय करायचं असतं हे तुम्ही सांगितलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.