मुंबई-चिपी विमानसेवा उद्यापासून होणार बंद, नेमकं कारण काय?

| Updated on: Oct 25, 2024 | 1:09 PM

मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा सुरु झाल्याने पर्यटकही आनंदित होते. विशेष म्हणजे ही विमानसेवा सिंधुदुर्ग वासियांसोबतच आणि पर्यटकांच्याही पसंतीस उतरली होती.

मुंबई-चिपी विमानसेवा उद्यापासून होणार बंद, नेमकं कारण काय?
सिंधुदुर्ग
Follow us on

Mumbai to Sindhudurg Chipi Airport : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी सुरु करण्यात आलेली चिपी-मुंबई विमानसेवा उद्यापासून बंद होणार आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे या मार्गावरील हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद करण्यात येणार आहेत.

तब्बल 20 वर्षांनी सिंधुदुर्गातील चिपी परुळे या विमानतळावरुन प्रवासी विमान सेवा सुरु झाली होती. मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा सुरु झाल्याने पर्यटकही आनंदित होते. विशेष म्हणजे ही विमानसेवा सिंधुदुर्ग वासियांसोबतच आणि पर्यटकांच्याही पसंतीस उतरली होती. काही महिन्यांपूर्वीच मोठ्या धुमधडाक्यात चिपी विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले होते. हे विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरले होते. मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आले होते. या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.

चिपी-मुंबई विमानसेवा बंद

मात्र मध्यंतरी अनियमित सेवेमुळे या विमानसेवेवर टीका झाली होती. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. पण याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे चिपी-मुंबई विमानसेवा बंद होणार आहे. याकाळात तिकीट विक्री बंद केली जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

नागरिकांकडून नाराजी व्यक्त

दरम्यान 9 ऑक्टोबर 2012 पासून सिंधुदुर्गातील विमानतळावरून ‘चिपी’ व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली होती. आता पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली असतानाच अचानक सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. यामुळे नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.