मुंबईतील लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाला पुन्हा गदुर्ल्याने फटका मारल्याने तो खाली कोसळून त्याच्या पायांवरुन लोकल गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत संबंधित तरुणाने दोन्ही पाय कायमचे गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी देखील एका पोलिस जवानाच्या हातावर गुर्दुल्याने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडला होता. तो शोधायला ट्रेनच्या खाली उतरलेल्या पोलिस जवानाला इंजेक्शनमधून कसला तरी द्रवपदार्थ टोचल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे दिवसेंदिवस लोकलचा प्रवास जीवघातक बनत चालला आहे. या फटका गॅंगचा उपद्रप पुन्हा वाढल्याने मध्य रेल्वेच्या पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकलमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असतो. कल्याण येथे राहणारे 31 वर्षीय जगन लक्ष्मण जंगले या प्रवाशाला लोकलच्या दारात उभे राहून मोबाईलवर बोलणे महागात पडले आहे. प्रवासी जगन याच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली कोसळला. त्यामुळे त्याच्या पायांवरुन लोकल गेल्याने त्याला दोन्ही पाय निकामी झाले आहेत. जगन याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये कामाला असलेल्या जगन यांनी 22 मे रोजी दादर स्थानकातून रा. साडे आठ वाजताची कल्याणला जाणारी लोकल पकडली. लोकलच्या दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने ठाणे स्थानक सोडल्यानंतर त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला. या हल्ल्यात जगन यांचा तोल गेल्याने ते लोकलमधून फलाट क्रमांक दोनपासून 200 मीटर पुढे खाली पडले. त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. ते मदतीसाठी धावा करीत असतानाच जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलची चाके गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना काही प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आणि पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. घरात एकुलता एक कमावणारा असलेल्या जगनची आर्थिक स्थिती बिकट आहे. नुकतेच त्याचे लग्न देखील झाले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागल्याने त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळांशेजारी फटका गॅंग कार्यरत असून ओव्हरहेडच्या खांबावर हे गर्दुल्ले चोरटे दबा धरुन बसलेले असतात. एखादा प्रवासी लोकलच्या दारात उभा असला आणि मोबाईल बोलण्यात गुंग असला की हे लाकडी बांबूने त्याचा हातावर फटका मारुन त्याचा मोबाईल खाली पाडतात. त्यानंतर हा मोबाईल घेऊन चोरटे पसार होतात. या फटका गॅंगवर कारवाई केल्याची आकडेवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे आरपीएफ आणि जीआरपी पोलिस नेहमी जारी करते, परंतू थोड्या दिवसांनी पुन्हा ही फटका गॅंग डोके वर काढते अशी टीका प्रवासी संघटनांनी केली आहे.